
नाशिकमध्ये (Nashik) सततच्या पावसामुळे गंगापूर धरण पूर्ण क्षमतेने भरून वाहू लागले आहे. आज (23 जून) दुपारी 2 वाजता गंगापूर धरणातून (Gangapur Dam) 6,160 क्युसेक पाणी सोडण्यात आले, ज्यामुळे गोदावरी नदीला (Godavari river) या पावसाळ्यात दुसऱ्यांदा पूर आला आहे. सध्या गोदावरी नदी दुथडी भरून वाहत असल्याचं चित्र आहे. गेल्या काही दिवसांपासून धरणाच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या मुसळधार पावसामुळे पाणीसाठ्यात लक्षणीय वाढ झाली आहे. शुक्रवार (20 जून) पासून गंगापूर धरणातून टप्प्याटप्प्याने पाणी सोडण्यात येत आहे. गेल्या दोन दिवसांपासून शहरातील पाऊस कमी झाला असला तरी, वरच्या प्रवाहातून वाढत्या आवकमुळे पाणी सोडणे सुरूच आहे.
शुक्रवारी 1160 क्युसेक पाणी सोडण्यात आले, त्यानंतर शनिवारी 2,320 क्युसेक, रविवारी 3,944 क्युसेक आणि सोमवार आणि मंगळवारी 6,160 क्युसेक पाणी सोडण्यात आले. या वाढत्या विसर्गामुळे गोदावरी नदीच्या पाण्याची पातळी झपाट्याने वाढली आहे. वाढलेल्या पाण्यामुळे आता नदीकाठच्या गावांना पुराचा धोका निर्माण झाल्याने जिल्हा प्रशासनाने रहिवाशांना इशारा जारी केला आहे.
गोदावरी नदीला पूर
#WATCH | Maharashtra: Godavari river overflows and floods several parts of Nashik following incessant rainfall here. pic.twitter.com/TDjNyQFrTY
— ANI (@ANI) June 24, 2025
नदीकाठच्या रहिवाशांना आवश्यक ती खबरदारी घेण्याचा आणि नदीपात्रात जाण्याचे टाळण्याचा सल्ला देण्यात आला आहे. नाशिक पाटबंधारे विकास महामंडळाच्या कार्यकारी अभियंता सोनल शहाणे यांच्या मते, शेतकऱ्यांना, विशेषतः पशुधन, कृषी उपकरणे आणि मोटर पंप सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. धरणातील साठवणूक पातळीत वाढ होत असल्याने, येत्या काही दिवसांत पाण्याचा विसर्ग आणखी वाढण्याची शक्यता आहे.