Food Adulteration: सणासुदीच्या दिवसात अन्नपदार्थांमध्ये भेसळ होण्याची शक्यता; नियमांचे उल्लंघन केल्यास दुकानदारांवर होणार कारवाई, जाणून घ्या कुठे कराल तक्रार

ज्या मिठाईच्या दुकानांमध्ये अथवा उत्पादकांकडे कायद्यातील तरतुदीचे उल्लंघन होत असल्याचे आढळून येईल, त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल, असे अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांनी सांगितले.

Food Adulteration: सणासुदीच्या दिवसात अन्नपदार्थांमध्ये भेसळ होण्याची शक्यता; नियमांचे उल्लंघन केल्यास दुकानदारांवर होणार कारवाई, जाणून घ्या कुठे कराल तक्रार
मिठाई (संग्रहित संपादित प्रतिमा)

सणासुदीच्या दिवसात खवा, मावा, मिठाई, खाद्यतेल, वनस्पती तूप इत्यादी अन्न पदार्थांना मोठ्या प्रमाणात मागणी असते. त्यामध्ये भेसळ होण्याची शक्यता लक्षात घेऊन अन्न व औषध प्रशासनातर्फे अन्न आस्थापनेची तपासणीची विशेष मोहीम सुरु केली आहे. ही मोहीम डिसेंबरपर्यत राबविण्यात येणार आहे. त्यानुसार उत्पादकांपासून ते किरकोळ दुकानांची तपासणी करण्यात येईल. ज्या मिठाईच्या दुकानांमध्ये अथवा उत्पादकांकडे कायद्यातील तरतुदीचे उल्लंघन होत असल्याचे आढळून येईल, त्यांच्यावर  कडक  कारवाई करण्यात येईल, असे अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांनी सांगितले.

सणासुदीच्या काळात उत्सवादरम्यान बाजारात विविध प्रकारच्या मिठाई विक्रीसाठी उपलब्ध असतात. यामध्ये मोठ्या प्रमाणात खवा, दूध, खाद्यतेल, तूप यापासून तयार होणारे अन्नपदार्थ उपयोगात आणले जातात. मागणी जास्त आणि आवक कमी, अशी परिस्थिती असल्यामुळे या काळात भेसळीचे प्रकार केले जातात. त्यामुळे सणासुदीच्या काळात होणारे भेसळीचे प्रकार टाळण्यासाठी मिठाई  विक्रेत्यांना  काही मार्गदर्शन सूचना अन्न व औषध प्रशासनाने दिल्या आहेत, असे मंत्री श्री. आत्राम यांनी सांगितले.

मिठाई ट्रेवर दर्शनी भागात वापरण्या योग्य दिनांक टाकावा, अन्नपदार्थ तयार करताना उत्पादकाची जागा स्वच्छ व आरोग्यदायी असावी, अन्न पदार्थ तयार करण्यासाठी लागणारा कच्चा माल हा परवानाधारक अथवा नोंदणीधारक अन्न व्यावसायिकांकडून खरेदी करावा व त्यांची खरेदी बिले जतन करावीत, भांडी स्वच्छ व आरोग्यदायी झाकण असलेली असावीत, अन्न पदार्थ तयार करण्यासाठी पिण्यायोग्य पाण्याचा वापर करावा, अन्न पदार्थ स्वच्छ व सुरक्षित ठिकाणी साठवावेत, त्वचा संसर्गजन्य रोगापासून मुक्त याबाबत कामगारांची वैद्यकीय तपासणी करावी, मिठाई तयार करताना केवळ फूड ग्रेड खाद्य रंगाचा १०० पी.पी.एम च्या मर्यादित वापर करावा, प्रादुर्भाव होऊ नये म्हणून अन्नपदार्थ जाळीदार झाकणाने झाकून ठेवावेत, अन्न पदार्थ तयार करताना वापरण्यात येणारे खाद्यतेल २-३ वेळेस तळण्यासाठी वापरण्यात यावे. त्यानंतर वापरलेले तेल रुको अंतर्गत नेमण्यात आलेल्या एग्रीकेटर यांना देण्यात यावेत आदी सूचनांचा त्यामध्ये समावेश आहे. (हेही वाचा: Mumbai Metro Line 3 Phase 1: मुंबईकरांना दिलासा! मेट्रो मार्ग 3 चा पहिला टप्पा या वर्षअखेरीस कार्यान्वित होण्याची शक्यता)

स्पेशल बर्फीचा वापर हा खवा किंवा मावा या अन्नपदार्थांना पर्याय म्हणून  करु नये. विक्रेत्यांनी त्यांच्या विक्री बिलावर एफएसएसएआय परवाना क्रमांक नमूद करावा, विक्रेत्यांनी दूध, दुग्धजन्य पदार्थ, खवा, मावा या नाशवंत पदार्थांची वाहतूक ही योग्य तापमानास व सुरक्षितरित्या करण्यात यावी.

ग्राहकांनी देखील जागरूक राहून अन्न पदार्थाच्या गुणवत्ता दर्जाबाबत किंवा अन्न आस्थापनाबाबत  कोणतीही तक्रार असल्यास त्याबाबत सविस्तर माहिती प्रशासनाच्या १८००-२२२-३६५ या टोल फ्री क्रमांकावर नोंदवावी, असे आवाहन मंत्री श्री. आत्राम यांनी केले आहे.

(The above story first appeared on LatestLY on Oct 27, 2023 12:04 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).