Farm Laws Repeal: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्यांची माफी मागून खटले मागे घ्यावेत- संजय राऊत
Sanjay Raut, PM Narendra Modi | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

केंद्र सरकारने बहुमताच्या जोरावर मंजूर केलेले कृषी कायदे ( Farm Laws) मागे घ्यावेत यासाठी आंदोलन करताना मृत्यूमुखी पडलेल्या 700 शेतकऱ्यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी माफी मागावी. तसेच, त्या शेतकऱ्यांचया कुटुंबीयांना आर्थिक मदत करावी. लाल किल्ला हिंसाचार प्रकरणी दाखल केलेले सर्व खटलेही केंद्र सरकारने मागे घ्यावेत, अशी मागणी शिवसेना (Shiv Sena) खासदार संजय राऊत यांनी केली आहे. मंजूर केलेले तीनही कृषी कायदे केंद्र सरकार मागे घेणार असल्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी आज (19 नोव्हेंबर) केली. त्यानंतर संजय राऊत (Sanjay Raut) यांनी ही भूमिका व्यक्त केली आहे.

काय म्हटले संजय राऊत यांनी

संजय राऊत यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, 'कृषी कायदे मागे घ्यावेत यासाठी सुरु असलेल्या आंदोलनात 700 शेतकऱ्यांनी आपला जीव गमावला. ज्या शेतकऱ्यांनी आंदोलनात जीव गमावला त्यांच्या कुटुंबीयांना केंद्राने आर्थिक मदत जाहीर करावी. तसेच, लाल किल्ला हिंसाचार प्रकरणी दाखल करण्यात आलेले सर्व खटले मागे घ्यावेत'. (हेही वाचा, CM Uddhav Thackeray on Farm Laws to be Repealed: 'कृषी कायदे मागे घेण्याची घोषणा म्हणजे सर्वसामान्य माणूस देशात काय करू शकतो, त्याच्या ताकदीचं उदाहरण'- उद्धव ठाकरे)

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कृषी कायदे मागे घेण्याच्या केंद्राच्या निर्णयावर म्हटले की, ''केंद्राने असे कायदे आणण्यापूर्वी सर्व विरोधी पक्ष तसेच संबंधित संघटनांना विश्वासात घेऊन देशहिताचा निर्णय घ्यायला हवे म्हणजे आज जी नामुष्की ओढवली आहे असं होणार नाही. हे कायदे मागे घेण्याची तांत्रिक प्रक्रिया लवकरात लवकर होईल अशी अपेक्षा आहे''.

निवडणुकीच्या तोंडावर निर्णय

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटले की, पुढच्याच वर्षी पंजाब, उत्तर प्रदेश आणि इतरही काही राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका आहेत. या निवडणुकांमध्ये सरकारबद्दल असलेल्या जनप्रक्षोभाचा फटका बसू नये यासाठी केंद्र सरकारने हा निर्णय घेतला आहे. पाठीमागील वर्षभरापासून देशभरातील हजारो शेतकरी दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करत आहेत. उन, वारा, पाऊस आणि थंडी झेलत आहेत. कशाचीही तमा न बाळगता या शेतकऱ्यांनी आंदोलन सुरु ठेवले. शेतकऱ्यांच्या आंदोलनाकडे दुर्लक्ष करण्याचाही सरकारने प्रयत्न केला. पण, शेवटी सरकारला झुकावे लागले. कृषी कायदे मागे घ्यावे लागले. शेतकऱ्यांच्या संघर्षाला आपण सलाम करतो, अशा शब्दांत शरद पवार यांनी आंदोलक शेतकऱ्यांचे कौतुक केले.