Covid-19 Vaccination in Maharashtra: लसीकरणाचा वेग वाढण्यासाठी दरमहा 2 कोटी डोसेस मिळणे गरजेचे- आरोग्यमंत्री राजेश टोपे
Rajesh Tope | (Photo Credits: Facebook)

राज्यातील नागरिकांचे पुरेशा प्रमाणात लसीकरण (Vaccination) होण्यासाठी केंद्राने महिन्याला कमीत कमी 2 कोटी लसींचे डोसेस पुरवणे गरजेचे असल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे (Health Minister Rajesh Tope) यांनी म्हटले आहे. टाईम्स ऑफ इंडियाच्या रिपोर्टनुसार, लसींच्या कमतरतेमुळे अनेक नागरिक लसीच्या दुसऱ्या डोसची प्रतिक्षा करत आहेत. तसंच कर्मचाऱ्यांचे लसीकरण पूर्ण न झाल्याने अनेक  व्यवसाय, उद्योगधंदे सुरु करणे शक्य होत नाहीये. याच पार्श्वभूमीवर लसीकरणाचा वेग वाढवण्यासाठी दरमहा 2 कोटी डोसेसची मागणी आरोग्यमंत्र्यांनी केली आहे. (Amazon Alexa आता तुमच्या जवळचं COVID-19 Vaccination Centres शोधायला करणार मदत; जाणून घ्या कसं?)

लवकरच केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडविया यांची भेट घेणार असल्याचं टोपे यांनी सांगितलं. या बैठकीत राज्यातील लसीकरणावर चर्चा करण्यात येईल. दिवसाला 10 लाख लसी देण्याचे लक्ष्य असल्याचेही त्यांनी सांगितले. परंतु, लसींच्या तुटवट्यामुळे लाखो नागरिक दुसऱ्या डोसच्या प्रतिक्षेत आहेत. आम्हाला लसी मिळत आहेत परंतु, लसीकरणाचा वेग वाढवण्यासाठी अधिक डोसेसची आवश्यकता असल्याचे टोपे यांनी सांगितले. (Maharashtra Unlock: मुंबई लोकल, हॉटेल, रेस्टॉरंट आणि दुकानदारांना मोठा दिलासा, राज्यात आजपासून काय सुरु आणि काय बंद? घ्या जाणून)

राज्यात कोरोनाची दुसरी लाट ओसरत असून निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत. तसंच लसीचे दोन्ही डोस घेतलेल्या नागरिकांसाठी लोकल, मेट्रो सेवा सुरु करण्यात आल्या आहेत. यामुळे दिलासादायक वातावरण निर्माण झाले असले तरी संकट अद्याप टळलेले नसल्याने नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. त्याचबरोबर तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर लसीकरणाचा वेग वाढणे आवश्यक आहे. दरम्यान, सध्या लसींच्या अभावामुळे लसीकरणाला दोन-तीन दिवसांचा ब्रेक लागत आहे.