Nagpur Winter Session: कॅगच्या अहवालावर देवेंद्र फडणवीस यांचे स्पष्टीकरण; अकाउंटिंग दोषामुळे गोंधळ झाल्याची माहिती
Devendra Fadnavis | (Photo Credits-ANI)

आज, 21 डिसेंबर रोजी विधानसभा हिवाळी अधिवेशनात (Maharashtra Vidhansabha Winter Session 2019) कॅगचा अहवाल सादर करण्यात आला, या अहवालातून समोर आलेल्या माहितीनुसार, देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकाळातील सन 2018 पासून तब्बल 66 हजार कोटींचा हिशोब लागत नसल्याचे समजत आहे. अनेक कामाच्या प्रलंबित प्रशस्तिपत्रकांमुळे इतक्या मोठ्या रक्कमेची अफरातफर झाली असण्याची शक्यता देखील वर्तवण्यात आली होती, आज हिवाळी अधिवेशनाच्या सत्रात या मुद्द्यावरून देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी प्रत्युत्तर देताना हा गोंधळ हा अफ़रातफ़रीचा नसून कॅगच्या (CAG) प्रणालीतील अकाउंटिंग दोषामुळे झाला आहे असे स्पष्टीकरण दिले. तसेच हा गोंधळ सोडवण्यासाठी ही पद्धती सुधारावी अशी सूचना देखील फडणवीस यांनी केली.

देवेंद्र फडणवीस यांनी भाषणात सध्याचे अर्थमंत्री जयंत पाटील यांचे देखील तोंड भरून कौतुक केले, सध्या तुमच्याकडे अर्थ विभाग आहे पुढे कोणता नाही पण माझी शिफारस चालणार असल्यास हे पद तुमच्याकडेच सोपवण्यात यावे असे फडणवीस यांनी जयंत पाटील यांना उद्देशून विधान केले. तर या वर उत्तर देताना जयंत यांनी सुद्धा मित्र असावा तर असा असे म्हणत फडणवीस यांचे आभार मानले.

दुसरीकडे, या भाषणातून काँग्रेसवर सुद्धा वार करण्याची संधी न दवडता काँग्रेस सरकारच्या काळात तर याहूनही अधिक घोटाळे झाले होते त्यातुलनेत हा तर केवळ तांत्रिक बाबींमुळे झालेला गोंधळ आहे असेही फडणवीस यांनी म्हंटले आहे.

CAA ला शरद पवार यांचा विरोध; एल्गार परिषदेच्या कारवाईची SIT मार्फत चौकशी करण्याची मागणी.

दरम्यान, 2018 पर्यंत झालेल्या विविध कामांसाठी दिलेल्या अनुदानांची उपयोगिता प्रमाणपत्रं गहाळ आहेत असे कॅगने अहवालात नमूद केले आहे. या सर्व प्रकरणातील एकूण रक्कम ही 65 हजार 921 कोटी रुपयांच्या कामांची असून 32 हजारांपेक्षा जास्त उपयोगिता प्रमाणपत्र सादर झालेली नाहीत अशी माहिती समोर आली आहे. तूर्तास या गोंधळाला भ्रष्टाचार म्हणता येणार नाही पुढच्या अधिवेशनात हा घोटाळा नव्हता हे सिद्ध करण्याची आम्हाला संधी मिळाली तर आनंद होईल असं अर्थमंत्री जयंत पाटील यांनी म्हटलं आहे.