MNS: मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर मनसेला मोठा धक्का; डोंबिवलीचे शहाराध्यक्ष यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेत प्रवेश

मुंबईत महापालिकेत (BMC) सत्ता असलेल्या शिवसेनेला (Shiv Sena) टक्कर देण्यासाठी भाजपसह (BJP) अनेक राजकीय पक्ष तयारी करताना दिसत आहे. मात्र, मुंबई महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीच्या आधीच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला (MNS) मोठा धक्का लागला आहे.

MNS: मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर मनसेला मोठा धक्का; डोंबिवलीचे शहाराध्यक्ष यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेत प्रवेश
राज ठाकरे (फोटो सौजन्य-इन्स्टाग्राम)

मुंबईत महापालिकेत (BMC) सत्ता असलेल्या शिवसेनेला (Shiv Sena) टक्कर देण्यासाठी भाजपसह (BJP) अनेक राजकीय पक्ष तयारी करताना दिसत आहे. मात्र, मुंबई महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीच्या आधीच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला (MNS) मोठा धक्का लागला आहे. मनसेचे प्रदेश उपाध्यक्ष व डोंबिवलीचे शहाराध्यक्ष राजेश कदम यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. बालेकिल्ला समजला जाणाऱ्या डोंबिवलीमध्ये (Dombivli) मनसेला मोठे खिंडार पडले आहे. दरम्यान, शिवसेना नेते एकनाथ शिंदे, खासदार श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थितीत मनसे कार्यकर्त्यांनी हातावर शिवबंधन बांधून घेतली आहेत.

राजेश कदम हे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासोबत विद्यार्थी सेनेपासून कार्यरत होते. मात्र, त्यांनी मनसेला रामराम ठोकल्याने पक्षासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. तसेच राजेश कदम यांच्यासोबत शिवसेनेत प्रवेश केलेले सर्व पदाधिकारी मनसे आमदार राजू पाटील यांच्या ग्रामीण मतदारसंघातील असल्याचे कळत आहे. यात मनसेचे सागर जेधे, डोंबिवली शहर संघटक दीपक भोसले, प्रदेश उपाध्यक्ष राहुल गणपुले, शहर सचिव कौस्तुभ फकडे, मनविसे शहर संघटक सचिन कस्तुर आदींसह अन्य पदाधिकाऱ्यांचा समावेश आहे, अशी माहिती समोर येत आहे. हे देखील वाचा- Uddhav Thackeray on Union Budget 2021: बजेट हा देशासाठी पाहिजे, निवडणुकांसाठी नको; केंद्र सरकारच्या अर्थसंकल्पावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची प्रतिक्रिया

लॉकडाऊनपासून मनसेचे कार्यकर्ते विविध मागणींसाठी आंदोलन करताना दिसत आहेत. याचा पक्षाला किती फायदा होणार? हे मुंबई महापालिकेच्या आगामी निवडणुकीच्या निकालानंतर स्पष्ट होईल. महत्वाचे म्हणजे, मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत मनसे कोणती भुमिका घेणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. महाराष्ट्रात गेल्या विधानसभा निवडणूकीत मनसेने जोरदार प्रचार करत भाजपच्या नाकी नऊ आणले होते. त्यावेळी महाराष्ट्रात मनसेची जादू दिसेल, अशी शक्यता व्यक्त केली जात होती. मात्र, त्यावेळी पक्षाचा केवळ एकच आमदार निवडून आला होता.

(The above story first appeared on LatestLY on Feb 01, 2021 10:07 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).