India's Food (Photo Credit : Pixabay)

India's Food Habits: वर्ल्ड वाइड फंड (World Wildlife Fund) फॉर नेचरच्या ताज्या अहवालात भारतीयांच्या खाण्याच्या सवयी जगातील सर्वोत्तम असल्याचे वर्णन करण्यात आले आहे. अहवालानुसार, भारतीयांच्या खाण्याच्या सवयी अंगीकारल्यास हरितगृह वायूंचे उत्सर्जन कमी होते. सर्व देशांनी याचा अवलंब केल्यास पर्यावरणाचे होणारे नुकसान मोठ्या प्रमाणात कमी होईल, असेही अहवालात म्हटले आहे. वर्ल्ड वाइड फंड फॉर नेचर नावाची संस्था वनसंपत्तीचे संरक्षण आणि पर्यावरणावरील मानवी प्रभाव कमी करण्यासाठी कार्य करते. या स्वित्झर्लंडस्थित अशासकीय संस्थेची स्थापना 1961 मध्ये झाली होती.

गुरुवारी जाहीर झालेल्या वर्ल्ड वाइड फंडच्या लिव्हिंग प्लॅनेट अहवालात, G20 देशांमध्ये भारतीय खाद्य सवयी सर्वात टिकाऊ असल्याचे वर्णन करण्यात आले आहे. अहवालात असे म्हटले आहे की, 2050 पर्यंत जगातील सर्व देशांनी भारताच्या खाण्याच्या पद्धतीचा अवलंब केला तर आपल्या अन्नाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी आपल्याला खूप कमी जमीन आवश्यक असेल. भारतातील अन्नामुळे होणारे हरितगृह वायूचे उत्सर्जन इतके कमी आहे की, जगाचे तापमान 1.5 अंश सेल्सिअसपेक्षा जास्त वाढणार नाही. भारतीय अन्नपद्धतींचा अवलंब हे हवामानासाठी सर्वात कमी नुकसानकारक असेल.

या अहवालात अर्जेंटिना, ऑस्ट्रेलिया आणि अमेरिकेतील खाण्याच्या पद्धती सर्वात वाईट असल्याचे वर्णन करण्यात आले आहे. अहवालात भारताच्या मिलेट मिशनचा विशेष उल्लेख करण्यात आला आहे. अहवालात म्हटले आहे की, जगातील प्रत्येक देशाने 2050 पर्यंत G-20 देशांच्या खाण्याच्या पद्धतींचा अवलंब केल्यास आपल्या गरजा पूर्ण करण्यासाठी सात पृथ्वी लागतील. अन्नासाठी हरितगृह वायू उत्सर्जन मानक 1.5 अंश सेल्सिअस आहे. जी-20 देशांच्या खाण्याच्या पद्धतीचा सर्व देशांनी अवलंब केला तर 263 टक्के अधिक जागतिक तापमानवाढ होईल. (हेही वाचा; Vegetarian and Non-Vegetarian Thalis Prices Drop: ग्राहकांना दिलासा! ऑगस्ट 2024 मध्ये शाकाहारी-मांसाहारी थाळीच्या किंमतीमध्ये अनुक्रमे 8 व 12 टक्क्यांनी घट- CRISIL)

मात्र, जर सर्व देशांनी भारताच्या अन्न पद्धतीचा अवलंब केला तर 2050 पर्यंत आपल्या ग्रहावरील 84 टक्के संसाधने आपल्या गरजा पूर्ण करण्यासाठी पुरेशी असतील. याचा अर्थ 16 टक्के संसाधने वापरली जाणार नाहीत. यामुळे जागतिक तापमानवाढही कमी होईल आणि पर्यावरणाचा समतोल सुधारेल. अर्जेंटिनाची खानपान व्यवस्था सर्वात वाईट आहे, त्यानंतर ऑस्ट्रेलिया (6.8), यूएसए (5.5), ब्राझील (5.2), फ्रान्स (5), इटली (4.6), कॅनडा (4.5) आणि यूके (3.9) यांचा क्रमांक लागतो.