Maharashtra Assembly Election 2019: महाराष्ट्रात मंत्रिमंडळ विस्तार; जुन्यांना डच्चू, नव्यांना मंत्रीपदाचा हार? महाराष्ट्राचे राजकारण घेतंय वेग
Maharashtra Assembly Election 2019 | (Photo credit: archived, edited, symbolic images)

Maharashtra Assembly Election 2019: आगामी विधानसभा निवडणूक 2019 तोंडावर आली असताना राज्यात राजकीय हालचालींना वेग आला आहे. या पार्श्वभूमविर राज्य सरकारमध्ये मंत्रिमंडळ विस्ताराच्या चर्चा रंगू लागल्या आहेत. विरोधी पक्ष आणि पक्षांतर्गत विरोधकांना गारद करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हे मंत्रिमंडळ विस्तार (Cabinet Expansion )करण्याचा डाव टाकू शकतात अशी सूत्रांची माहिती आहे. दरम्यान, संभाव्य मंत्रिमंडळ विस्तार झालाच तर, विरोधी पक्षातील नेते राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) आणि काँग्रेसचे बीडचे आमदार जयदत्त क्षीरसागर यांची वर्णी लागण्याची शक्यता आहे. दरम्यान, लोकसभा निवडणूक 2019 मध्ये विरोधी पक्ष नेते पदावर असूनही राधाकृष्ण विखे पाटील यांनी भाजपचा प्रचार केला होता. दरम्यान, मंत्रिमंडळ विस्तारात अनेक विद्यमान मंत्र्यांना डच्चू मिळणार असून, नव्या चेरऱ्यांचा मंत्रिमंडळात समावेश होईल, अशीही जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे.

येत्या 17 जूनपपासून विधानसभेचे पावसाळी अधिवेशन मुंबई येथे सुरु होत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निकटवर्तीयांच्या हवाल्याने प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तातही अधिवेशनापूर्वीच मंत्रिमंडळ विस्तार आटोपण्याचा मुख्यमंत्र्याचा विचार असल्याची चर्चा भाजपच्या वरिष्ठ गोटात असल्याची चर्चा आहे.

मंत्रिमंडळ विस्तारात राधाकृष्ण विखे पाटील आणि काँग्रेस आमदार जयदत्त क्षीरसागर यांचा मंत्रिमंडळ विस्तारात संधी मिळू शकते, असे खात्रीशीर वृत्त सूत्रांकडून येते आहे. राधाकृष्ण विखे पाटील यांचे चिरंजीव सुजय विखे पाटील यांनी लोकसभा निवडणूक 2019 साठी उमेदवारी अर्ज भरण्यास काहीच तासांचा अवधी बाकी असताना भाजपमध्ये प्रवेश केला. सुजय यांच्या तिकीटावरुन काँग्रेस, राष्ट्रवादी यांच्यात झालेली खेचाखेची सर्वश्रुत आहे. तर, विरोधी पक्ष नेते असतानाही राधाकृष्ण यांनी केलेला चिरंजीव आणि भाजप उमेदवार सुजय यांचा प्रचार तर राजकीय चर्चेचा आणि थट्टेचा विषय ठरला होता. तर जयदत्त क्षीरसागर हे सुद्धा भाजप प्रचाराच्या आघाडीवर होते. या पार्श्वभूमिवर या दोघांची वर्णी नक्की मानली जात आहे. (हेही वाचा, राज्यात मंत्रिमंडळ विस्ताराचा पाळणा हालणार? नव्यांना संधी, जुन्यांना डच्चू?)

दरम्यान, या मंत्रिमंडळ विस्तारात मित्रपक्ष शिवसेनेलाही सत्तेचा व्यापक वाटा मिळू शकतो. त्यासाठी शिवसेनेच्या अधिकाधिक चेहऱ्यांना मंत्रिपदांची संधी दिली जाऊ शकते. दुसऱ्या बाजूला काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला धक्का देण्यासाठी या दोन पक्षातील बंडखोरांनाही मंत्रिमंडळविस्तारात सामाऊन घेतले जाऊ शकते.

दरम्यान, मंत्रिमंडळ विस्ताराच्या चर्चेने भाजप, शिवसेना आणि विरोधी पक्षातील अनेक नेत्यांच्या मनात आनंदाच्या उकळ्या फुटत असल्या तरी, काहींच्या पोटात मात्र गोळा आला आहे. कारण, मंत्रिमंडळ विस्तारात अनेकांचा खांदेपालट केला जाऊ शकतो. तर, काहिंना डच्चूही मिळू शकतो. त्यामुळे प्रत्यक्ष मंत्रिमंडळ विस्तार होतो का आणि झालाच तर, तो कोणाच्या पथ्यावर पडतो याबाबत उत्सुकता आहे.