Uttar Pradesh Assembly Elections: निवडणूक निकालाच्या दोन दिवस आधी EVM मशीनची चोरी; Akhilesh Yadav यांचा आरोप

अखिलेश यादव म्हणाले की, इव्हीएम चोरीवर पांघरूण घालता यावे यासाठी एक्झिट पोल केले आहेत. बनारस आणि अयोध्येत समाजवादी पक्ष विजयी होत असल्याचा दावा अखिलेश यांनी केला. त्यामुळे युती 300 जागांवर पोहोचेल आणि यूपीमध्ये त्यांचेच सरकार स्थापन होईल, असेही ते म्हणाले

Uttar Pradesh Assembly Elections: निवडणूक निकालाच्या दोन दिवस आधी EVM मशीनची चोरी; Akhilesh Yadav यांचा आरोप
Akhilesh Yadav (Photo Credits-Twitter)

उत्तर प्रदेशच्या विधानसभा निवडणुका (Uttar Pradesh Assembly Elections) पूर्ण झाल्या आहेत. आता जनता निकालाची वाट पाहत आहे. सोमवारी सातवा आणि शेवटचा टप्पा पार पडला. त्यानंतर 10 मार्चला निकाल हाती येणार आहेत. निवडणुकीच्या निकालापूर्वी एक्झिट पोलमुळे चर्चेला उधाण आले आहे. आता समाजवादी पक्षाचे प्रमुख आणि यूपीचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव (Akhilesh Yadav) यांनीही यावर प्रतिक्रिया दिली आहे. अखिलेश यांनी एक्झिट पोलवर प्रश्न उपस्थित केले आहेत. अखिलेश यादव म्हणाले की, ही निवडणूक लोकशाहीची शेवटची निवडणूक आहे, आता लोकशाही वाचवण्यासाठी जनतेला क्रांती करावी लागेल.

उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या निकालापूर्वी आज समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी पत्रकार परिषदेमध्ये यूपी सरकारवर ईव्हीएमबाबत गंभीर आरोप केले. अखिलेश यादव यांनी ट्विट करून म्हटले आहे की, वाराणसीमध्ये ईव्हीएम चोरीची बातमी यूपीच्या प्रत्येक विधानसभेला सतर्क राहण्याचा संदेश देत आहे. मतमोजणीत हेराफेरीचा प्रयत्न हाणून पाडण्यासाठी सपा-आघाडीचे सर्व उमेदवार आणि समर्थकांनी आपले कॅमेरे घेऊन सज्ज राहावे. युवा लोकशाही आणि भविष्याचे रक्षण करण्यासाठी मतमोजणीत सैनिक म्हणून काम करा.’

सपा प्रमुख अखिलेश यादव यांनी ईव्हीएममध्ये हेराफेरीचा आरोप केला आहे. ते म्हणाले की, सुरक्षेशिवाय ईव्हीएम आणले जात आहेत. बरेलीमध्ये कचऱ्याच्या गाडीत ईव्हीएम मशिन सापडल्या आहेत. बनारसमध्ये एक वाहन पकडले, दोन वाहने पळून गेली. सुरक्षेशिवाय ईव्हीएम काढण्याचे कारण काय? असा सवाल त्यांनी केला. तसेच उमेदवाराला माहिती न देता तुम्ही ईव्हीएम एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी हलवू शकत नाही. (हेही वाचा: Rajya Sabha Election 2022: राज्यसभेच्या 13 जागांसाठी 31 मार्च रोजी मतदान, निवडणूक आयोगाची घोषणा)

अखिलेश यादव म्हणाले की, इव्हीएम चोरीवर पांघरूण घालता यावे यासाठी एक्झिट पोल केले आहेत. बनारस आणि अयोध्येत समाजवादी पक्ष विजयी होत असल्याचा दावा अखिलेश यांनी केला. त्यामुळे युती 300 जागांवर पोहोचेल आणि यूपीमध्ये त्यांचेच सरकार स्थापन होईल, असेही ते म्हणाले. दरम्यान, यूपीमध्ये पुन्हा एकदा भाजपचे सरकार स्थापन होऊ शकते, असे एक्झिट पोलमध्ये सांगण्यात आले आहे. अनेक एक्झिट पोलने भाजपला 250 हून अधिक जागा मिळण्याची शक्यता वर्तवली आहे.

(The above story first appeared on LatestLY on Mar 08, 2022 09:04 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).