Rajasthan Political Crisis: राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी पंतप्रधान मोदी यांना लिहिले पत्र, म्हटले 'आपणास या गोष्टीची कल्पना आहे?'
CM Ashok Gehlot Writes A Letter To PM Narendra Modi | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत (Rajasthan CM Ashok Gehlot) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांना एक पत्र लिहिले आहे. या पत्रात गहलोत यांनी राजस्थानमध्ये सुरु असलेले राजकीय नाट्य, आमदारांचा घोडेबाजार आणि आणि सरकार अस्थिर करण्याबाबत निर्माण केल्या जाणाऱ्या परिस्थितीबाबत लिहिले आहे. लोकशाही मार्गाने निवडूण आलेले सरकार अस्थिर करण्याचा कूटील प्रयत्न राजस्थानमध्ये सुरु आहे. या सर्व प्रकारांची माहिती आपल्याला आहे किंवा नाही याबाबत माहिती नाही. परंतू आपले लक्ष या गोष्टींकडे वेधण्यासाठी आपण हे पत्र लिहित असल्याचे गहलोत यांनी पत्रात (CM Ashok Gehlot Writes A Letter To PM Narendra Modi) म्हटले आहे.

अशोक गहलोत यांनी या पत्रात पुढे म्हटले आहे की, माजी पंतप्रधान दिवंगत राजीव गांधी यांच्या तत्कालीन सरकारने 1985 मध्ये तयार केलेला आणि माजी पंतप्रधान दिवंगत अटलबिहारी वाजपेयी सरकारने सुधारणा केलेल्या पक्षांतरबंदी कायदा देशात अस्तित्वात आहे. या कायद्याचे उल्लंघन करुन राजस्थानमधील बहुमतातील सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न केला जात आहे. असे करणे हे जनादेशाचा अपमान तर आहेच. परंतू, लोकशाही मुल्यांना काळीमा लावण्याचाही प्रकार आहे. कर्नाटक आणि मध्य प्रदेश या घटनांचे उदाहरण आहे. (हेही वाचा, Rajasthan Political Crisis: सचिन पायलट यांना दिलासा, 24 जुलै पर्यंत कोणतीही कारवाई नाही; उच्च न्यायालयाने निर्णय राखून ठेवला)

देशासमोर कोरोना व्हायरस महामारीसारखे भयावह संकट उभे ठाकले आहे. या संकटाविरुद्ध लढायचे सोडून राज्यातील सरकार अस्थिर करण्याबाबत प्रयत्न केले जात आहेत. अशा प्रकारच्या कृत्यामध्ये केंद्रीय मंत्री गजेंद्र सिंह शेखावत आणि भाजपच्या अनेक वरिष्ठ मंत्र्यांचाही समावेश आहे, असेही गहलोत यांनी आपल्या पत्रात उल्लेख केला आहे.