Pune Metro Line 3: हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रो लाईन 3 चे उद्घाटन लांबणीवर? उद्घाटनाच्या तारखेसोबत मोठा सरप्राईज!

पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो लाईन ३ चे उद्घाटन लांबणीवर पडले आहे. पहिल्या टप्प्यातील १२ स्थानकांचे काम पूर्ण झाले असून उर्वरित ४ स्थानकांच्या मंजुरीची प्रक्रिया सुरू असल्याने आता थेट १६ स्थानके एकाच वेळी सुरू होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Metro | (Photo Credits: facebook)

Pune Metro Line 3: पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचा (PMRDA) महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या माण-हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो लाईन-३ ची प्रतीक्षा करणाऱ्या पुणेकरांची, विशेषतः हिंजवडी परिसरातील आयटी कर्मचाऱ्यांची वाट पाहणे आणखी वाढले आहे. पहिल्या टप्प्यातील स्थानकांचे काम पूर्ण झाले असले तरी उद्घाटनाची तारीख अद्याप निश्चित झालेली नाही. दरम्यान, उर्वरित स्थानकांच्या मंजुरीची प्रक्रिया वेगाने पूर्ण करून आता १२ ऐवजी थेट १६ स्थानके एकाच वेळी प्रवाशांसाठी खुली केली जाण्याची चिन्हे दिसत आहेत.

सुरक्षा मंजुरी आणि सद्यस्थिती

पहिल्या टप्प्यातील माण ते बालेवाडी (आर. के. लक्ष्मण म्युझियम) या सुमारे १३ किलोमीटर लांबीच्या मार्गावरील १२ स्थानकांना मेट्रो रेल्वे सुरक्षा आयुक्तांकडून (CMRS) तात्पुरती सुरक्षा मंजुरी मिळाली आहे. या मार्गावरील सुमारे ९६.५ टक्के काम पूर्ण झाले असून जिने आणि किरकोळ फिनिशिंगची कामे अंतिम टप्प्यात पोहोचली आहेत.

दुसऱ्या बाजूला, सकाळनगर, पुणे विद्यापीठ, आरबीआय आणि जिल्हा न्यायालय या उर्वरित चार स्थानकांसाठी आवश्यक सीएमआरएस मंजुरीची प्रक्रिया सुरू आहे. या स्थानकांचे तांत्रिक दस्तावेज आणि डेटा तपासणीचे काम प्रगतीपथावर आहे. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर प्रत्यक्ष उद्घाटनाच्या वेळेस एकूण १६ स्थानकांना एकत्रच हिरवा कंदील मिळण्याची शक्यता प्रशासनाकडून वर्तवली जात आहे.

उद्घाटनाच्या मुहूर्ताबाबत हालचाली

मेट्रोच्या औपचारिक उद्घाटनासंदर्भात पीएमआरडीएने राज्य शासनाकडे आधीच पत्रव्यवहार केला आहे. या प्रकल्पाच्या उद्घाटनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आमंत्रित करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. बारामती आणि पुण्याच्या इतर नियोजित दौऱ्यांचा मेळ घालून या मेट्रो मार्गाच्या उद्घाटनाचा अधिकृत मुहूर्त निश्चित केला जाण्याची शक्यता प्रशासकीय वर्तुळात व्यक्त होत आहे.

आयटी कर्मचाऱ्यांची नाराजी

पहिल्या टप्प्यातील काम पूर्ण होऊनही केवळ औपचारिक उद्घाटनाची तारीख न ठरल्याने मेट्रो सेवा सुरू झालेली नाही. परिणामी, हिंजवडी आणि बालेवाडी परिसरातील नागरिक तसेच आयटी कर्मचाऱ्यांमधून नाराजीचे सूर उमटत आहेत. दररोजच्या गंभीर वाहतूक कोंडीचा त्रास टाळण्यासाठी तयार झालेला पहिला टप्पा तातडीने कार्यान्वित करावा, अशी मागणी प्रवासी आणि स्थानिक संघटनांकडून सातत्याने केली जात आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement