Maharashtra-Karnataka Border Row: 'महाराष्ट्राला एक इंचही जमीन देणार नाही'; कर्नाटकचे मुख्यमंत्री Basavaraj Bommai यांनी स्पष्ट केली भूमिका

बोम्मई पुढे म्हणाले की, 'आम्ही आमच्या निर्णयावर ठाम आहोत, हे महाराष्ट्रालाही माहीत आहे. मी महाराष्ट्रातील राजकारण्यांना कळकळीची विनंती करतो की त्यांनी राजकीय खेळीसाठी भाषा किंवा सीमाप्रश्नांचा वापर करू नये.'

Karnataka Chief Minister Basavaraj Bommai (Photo Credits: Facebook)

गेल्या अनेक वर्षांपासून महाराष्ट्र (Maharashtra) व कर्नाटक (Karnataka) यांच्यामध्ये सीमावाद (Border Row) सुरु आहे. यंदाच्या महाराष्ट्र दिनाच्या भाषणामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी पुन्हा त्याचा पुनरुच्चार केला. यावेळी ते म्हणाले, बेळगाव, कारवार, निपाणी, बिदर, भालकीसह सीमाभागातील समस्त मराठी गावे महाराष्ट्रात सामील करण्याचे स्वप्न अद्याप अपूर्ण असून सीमाभागातील शेवटचे मराठी गाव महाराष्ट्रात येईपर्यंत आपला लढा सुरुच राहील. पवारांच्या या भाषणानंतर पुन्हा एकदा राजकारण तापले आहे. आता यावर कर्नाटकच्या नेत्यांच्या प्रतिक्रिया समोर येऊ लागल्या आहेत.

कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई (CM Basavaraj Bommai) यांनी सोमवारी महाराष्ट्रासोबतच्या सीमावादावर इशारा दिला आहे. कर्नाटक राज्य आपली एक इंचही जमीन शेजारच्या राज्याला देणार नाही, असे त्यांनी स्पष्टपणे सांगितले. यासोबतच त्यांनी महाराष्ट्रातील राजकारण्यांनी आपल्या राजकीय अस्तित्वासाठी भाषेचा मुद्दा नौटंकी किंवा सीमाप्रश्नाचा वापर करू नये, असे आवाहन केले. यासोबतच अनेक कन्नड भाषिक महाराष्ट्रात आहेत, त्यांचा कर्नाटकात समावेश करण्याचा विचार सुरू असल्याचेही त्यांनी नमूद केले. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वक्तव्यावर पलटवार करताना त्यांनी रविवारी ही माहिती दिली.

सीमावादावर अशाप्रकारे आपली भूमिका स्पष्ट करण्याची कर्नाटकची ही पहिलीच वेळ नाही, याधीही आपण आपली जमीन देणार नाही, असे त्यांनी सांगितले आहे. महाराष्ट्राच्या स्थापनेची 62 वर्षे पूर्ण होत असताना कर्नाटकातील बिदर, भालकी, बेळगाव, कारवार, निपाणी आदी ठिकाणची मराठी भाषिक गावे महाराष्ट्रात विलीन होत नसल्याची खंत महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केली होती. ही गावे महाराष्ट्राचा एक भाग होण्याच्या लढ्यात महाराष्ट्रातील नागरिक आणि सरकार त्यांच्यासोबत आहे, असेही ते म्हणाले होते.

पुढे, जोपर्यंत ही गावे महाराष्ट्राचा भाग होत नाहीत तोपर्यंत त्यांच्या लढ्याला आमचा पाठिंबा राहील, असे वक्तव्य त्यांनी केले. त्यानंतर कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी रविवारी यावर प्रतिक्रिया दिली. मुख्यमंत्री म्हणाले की, महाराष्ट्र सध्या राजकीय संकटाचा सामना करत आहे. त्यांचे संपूर्ण सरकार एका दगडाखाली आहे, त्यामुळे राजकीयदृष्ट्या टिकून राहण्यासाठी ते अशा मुद्द्यांचा वापर करून सीमाप्रश्न उपस्थित करत आहेत. सीमाप्रश्नावर कर्नाटकची भूमिका स्पष्ट आहे, राज्य कशापुढेही झुकणार नाही. (हेही वाचा: महाराष्ट्र दिनानिमित्त अजित पवार म्हणाले, मराठी भाषिक गाव आपल्या राज्याचा भाग बनवण्यासाठी सरकार नेहमी लढा देत राहिल)

बोम्मई पुढे म्हणाले की, आम्ही आमच्या निर्णयावर ठाम आहोत, हे महाराष्ट्रालाही माहीत आहे. मी महाराष्ट्रातील राजकारण्यांना कळकळीची विनंती करतो की त्यांनी राजकीय खेळीसाठी भाषा किंवा सीमाप्रश्नांचा वापर करू नये. दरम्यान, महाराष्ट्राचा दावा आहे की बेळगावी आणि आसपासचा सीमावर्ती जिल्हा पूर्वीच्या बॉम्बे प्रेसिडेन्सीचा भाग होता, परंतु सध्या तो भाषिक आधारावर कर्नाटकचा भाग आहे. बेळगावच्या सीमावर्ती भागातील 800 गावे महाराष्ट्रात विलीन करण्यासाठी लढा देत असलेल्या महाराष्ट्र एकीकरण समितीने याआधी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनाही आपल्या मागण्यांचे निवेदन सादर केले होते.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now