Madhya Pradesh: सरकार वाचवण्यासाठी मुख्यमंत्री कमलनाथ यांचे प्रयत्न; पक्षात असलेल्या 92 कॉंग्रेस आमदारांची जयपुरला रवानगी
मध्य प्रदेशातील (Madhya Pradesh) राजकारणाचे चित्र प्रत्येक क्षणी बदलत आहे. सोमवारी रंगलेल्या राजकीय नाटकानंतर आता कॉंग्रेस (Congress) आणि भाजप (BJP) आपापल्या आमदारांना घोडेबाजारापासून वाचविण्याचा प्रयत्न करीत आहे
मध्य प्रदेशातील (Madhya Pradesh) राजकारणाचे चित्र प्रत्येक क्षणी बदलत आहे. सोमवारी रंगलेल्या राजकीय नाटकानंतर आता कॉंग्रेस (Congress) आणि भाजप (BJP) आपापल्या आमदारांना घोडेबाजारापासून वाचविण्याचा प्रयत्न करीत आहे. माजी केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधियाखेरीज (Jyotiraditya Scindia) कॉंग्रेसच्या 22 आमदार-मंत्र्यांनी राजीनामा दिल्यानंतर, कमलनाथ सरकारला आपले बहुमत सिद्ध करणे अत्यंत अवघड झाले आहे. परंतु मुख्यमंत्री कमलनाथ यांचे म्हणणे आहे की, त्यांचे सरकार बहुमत सिद्ध करेल आणि कार्यकाळही पूर्ण करेल. या पार्श्वभूमीवर कॉंग्रेसने उर्वरित 92 आमदारांना, राजस्थानच्या जयपूर (Jaipur) येथे हलवले आहे. या ठिकाणी कॉंग्रेसने काही महिन्यांपूर्वी आपल्या महाराष्ट्रातील आमदारांनाही ठेवले होते.
कॉंग्रेसला मोठा धक्का देत पक्षाचे प्रख्यात युवा नेते ज्योतिरादित्य सिंधिया यांनी पक्षाच्या 22 आमदारांसह मंगळवारी राजीनामा दिला. ही गोष्ट कमलनाथ सरकारसाठी जणू काही भुकंपासारखी होती. कॉंग्रेस सोडलेले 49 वर्षीय सिंधिया केंद्रातील सत्ताधारी भारतीय जनता पार्टीमध्ये सामील होतील अशा वाताम्या आहेत. अशी शक्यता वर्तविली जात आहे की, सिंधिया यांना भाजपकडून राज्यसभेचे तिकीट दिले जाऊ शकते आणि त्यांना केंद्रीय मंत्री केले जाऊ शकते. आता पक्षाचे सरचिटणीस आणि ग्वाल्हेर राजघराण्यातील वंशज ज्योतिरादित्य सिंधिया यांना पक्षविरोधी कारवायांमुळे कॉंग्रेसने हद्दपार केले आहे. (हेही वाचा: MP Political Crisis: 'विधानसभेत बहुमत सिद्ध करु' कमलनाथ गटाचा दावा; बंडखोर आमदारांची नाराजी दूर केली जाणार)
मंगळवारी सकाळी ज्योतिरादित्य सिंधिया यांनी अमित शाह आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. त्यानंतर आता मुख्यमंत्री कमलनाथ आपला 'मास्टर स्ट्रोक' खेळणार असल्याचा दावा, राज्य सरकारमधील मंत्री पीसी शर्मा यांनी केला आहे. मात्र हा 'मास्टर स्ट्रोक' काय असेल याबद्दल काहीही बोलण्यास त्यांनी नकार दिला. कमलनाथ सरकार, राज्य सरकार पूर्णपणे सुरक्षित आहे असेही ते म्हणाले. भाजपचे आमदारही काल रात्री उशिरा दिल्लीला पोहचले. या सर्व आमदारांना पक्षाने गुडगाव येथे हलवले.
(The above story first appeared on LatestLY on Mar 11, 2020 10:00 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

