लोकसभेच्या एससी/एसटी जागांसाठी आरक्षण, दहा वर्षांसाठी वाढविण्याच्या कायद्यास मान्यता; 22 जानेवारी 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE
आजच्या दिवसभरातील ठळक बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचण्यासाठी 'लेटेस्टली मराठी' ला अवश्य भेट द्या
राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी लोकसभेच्या एससी / एसटी जागांसाठी आरक्षण, दहा वर्षांसाठी वाढविण्याच्या कायद्यास मान्यता दिली. 25 जानेवारी 2020 पासून हा कायदा लागू होईल.
खेलो इंडिया युथ गेम्सच्या तिसर्या सत्राची सांगता बुधवारी रंगारंग सोहळ्याने झाली. या स्पर्धेत महाराष्ट्र संघ 78 सुवर्ण पदकांसह 256 पदके जिंकून या स्पर्धांचा विजेता ठरला. या 13 दिवसांच्या स्पर्धेत महाराष्ट्राने 78 सुवर्ण, 77 रौप्य आणि 101 कांस्यपदकांसह सलग दुसऱ्यांदा खेलो इंडिया युवा क्रीडा करंडक जिंकला.
सरकारकडून मुंबई विद्यापीठाला 200 कोटींचा निधी देण्यात आला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज याबाबत माहिती दिली. हा दोनशे कोटींचा निधी चार वर्षात टप्प्याटप्याने उपलब्ध करण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला आहे. मुंबई विद्यापीठाची फोर्ट येथील इमारत व परिसराचे मूळ कलात्मक (हेरिटेज) सौंदर्य पूर्ववत जतन करुन तेथील निसर्गसंपदा वृद्धिंगत करण्यासाठी हा निधी उपलब्ध करून दिला आहे.
केंद्र सरकारने जम्मू-कश्मीर च्या विकासासाठी 80,000 कोटींची मंजूरी दिली असल्याची माहिती मनुष्यबळ विकास मंत्रालयाने दिली आहे. हा निर्णय जम्मू-कश्मीरच्या विकासासाठी खूपच महत्त्वाचा असल्याचे सांगितले जात आहे.
कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या निवडणुकीत पात्र शेतकऱ्यांना मतदानाचा अधिकार देण्यासाठी 2017 मध्ये केलेली सुधारणा रद्द करुन पूर्वीप्रमाणेच विविध कार्यकारी सेवा संस्थांमधून सदस्य निवड करण्यास आणि त्यादृष्टीने अध्यादेश प्रख्यापित करण्यास मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली.
मुंबईत काम करणा-या सफाई कर्मचारी व त्यांच्या कुटूंबियांसाठी 16,000 घरे उपलब्ध करुन देणार असल्याची घोषणा सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी दिली आहे. तसेच तसेच लाड-पागे समितीच्या शिफारशीनुसार सर्व सफाई कामगारांना लाभ देण्याबाबतच्या विषयी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबरोबर लवकरच बैठक घेण्यात येईल,” असं मुंडे यांनी बैठकीत सांगितलं.
बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत असलेला 'तान्हाजी- द अनसंग वॉरियर' हा चित्रपट टॅक्स फ्री केल्याबद्दल या चित्रपटातील मुख्य अभिनेता अजय देवगण ने ट्विटच्या माध्यमातून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे विशेष आभार मानले.
शिवसेना खासदार संजय राऊत यांनी महाराष्ट्र सरकारवर कौतुकाचा वर्षाव करत एक खास ट्विट केले आहे. सरकार जोरात कामास लागले आहे. पाच वर्षे पुर्ण करणारच! प्रभू श्रीरामाची कृपा. सरकारला शंभर दिवस पुर्ण होताच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अयोध्येस जातील .श्रीरामाचे दर्शन घेऊन पुढील कार्याची दिशा ठरवतील असे राऊत यांचे ट्विट आहे. वास्तविक अयोध्या राम मंदिराचा निर्णय येताच उद्धव ठाकरे अयोध्या दौरा करणार होते मात्र मध्यंतरी निवडणूक आणि सत्तासंघर्षामुळे हा दौरा लांबणीवर पडला आहे.
कुख्यात डॉन दाऊद इब्राहिम याचा निकटवर्तीय एजाज लकडावाला याला 27 जानेवारी पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. अंधेरी मधील एक व्यापाराकडे खंडणी मागण्याच्या आरोपावरून ही कारवाई करण्यात आली असली तरी एजाज हा मागील कित्येक महिन्यांपासून पोलिसांच्या हिट लिस्ट वर होता. मुंबई पोलिसांकडे आतापर्यंत त्याच्या विरुद्ध 80 तक्रारी दाखल झाल्या आहेत.
शिवथाळी योजनेचा लाभ घेण्यासाठी आधार कार्डची सक्ती करण्यात आली आहे, असे वृत्त प्रसारमाध्यमांमध्ये झळकत आहे. यावर महाविकास आघाडीचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी आपली प्रतिक्रिया नोंदवली आहे. शिवथाळी योजनेचा फायदा गरीबांनाच मिळावा व या योजनेचा गैरफायदा कुणी घेऊ नये याची आम्ही काळजी घेणार असल्याचे ते म्हणाले आहेत. तसेच शिवभोजनासाठी आधार कार्डची गरज लागणार नाही, असेही छगन भुजबळ यांनी स्पष्ट केले.
महाराष्ट्र मंत्रिमंडळ बैठकीत मुंबई मध्ये नाईट लाईफ सुरु करण्याच्या निर्णयाला मंत्रिमंडळाची मंजुरी मिळाली आहे. असं असलं तरीही पब आणि बार च्या वेळांमध्ये वाढ करण्यात येणार नाही, पूर्वीसारखेच रात्री दीड वाजेपर्यंत दारूविक्रीला परवानगी असेल असेही या बैठकीत स्पष्ट करण्यात आले आहे. यामुळे मुंबई पोलिसांवर अतिरिक्त तणाव येणार नाही असा विश्वास पर्यटन आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केला.
मनसे महाअधिवेशनात मनसेचा झेंडा भगवा करणार असल्याच्या चर्चा आणि त्यातूनच पुढे मनसे व भाजप एकत्र येणायच्या शक्यतांवर प्रतिक्रिया देताना भाजप नेते आशिष शेलार यांनी जो कोणी भगव्यावर प्रेम करेल त्याच्या बाबत आमच्या मनात प्रेम असेलच असे विधान केले आहे.
शालेय विद्यार्थ्यांसाठी संविधानाच्या प्रस्तावनेचे पठण राबवण्याच्या महाराष्ट्र सरकारच्या उपक्रमाचे भाजप नेते आशिष शेलार यांनी स्वागत केले आहे. मात्र कौतुक करत असताना "जर का उद्या मुलांनी जय हिंद किंवा वंदे मातरम म्हंटल तर त्यांना तुरुंगात डांबू नका" असा टोला देखील शेलार यांनी लगावला आहे.
भाजपला महाराष्ट्रापासून दूर करण्यासाठी काँग्रेसने मुस्लिम संघटनांचे म्हणणे ऐकून शिवसेनेची बाजू निवडली असं म्हणणारे काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांच्यावर आज भाजपचे प्रवक्ते संबित पात्रा यांनी कडाडून टीका केली. काँग्रेस स्वतःच्या फायद्यासाठी मुस्लिमांचा वापर करत आहे. आणि आजवर केवळ त्यांनी अशीच वागणूक केली आहे. जर का काँग्रेस ला केवळ मुस्लिमांसाठीच काम करायचे असेल तर त्यांचे नाव इंडियन नॅशनल काँग्रेस बदलून मुस्लिम लीग काँग्रेस केले जावे असेही संबित पात्रा यांनी म्हंटले आहे.
साईबाबा जन्मस्थळ वादावरून पाथरी ग्रामस्थांची भूमिका मांडण्यासाठी शिवसेना खासदार संजय जाधव मुंबईत राज्य सचिवालयात दाखल झाले आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी ते चर्चा करणार आहेत, या बैठकीसाठी त्यांना खास वेळ देण्यात आलेला नसूनही त्यांनी थेट सचिवालय गाठले आहे.
अल्पवयीन मुलीच्या विनयभंग प्रकरणात अटक करण्यात आलेल्या पोलिस उपमहानिरीक्षक निशिकांत मोरे यांना जामीन मंजूर करण्यात आला आहे. 25 हजाराचा दंड भरण्याचे तसेच पुढील तपासात सहकार्य करण्याचे निर्देश देऊन मुंबई उच्च न्यायालयाने त्यांना जामीन दिला आहे.
नागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्या (सीएए) घटनात्मक वैधतेला आव्हान देणाऱ्या 144 याचिकांवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडली असून यात सरन्यायाधीश शरद बोबडे यांनी नोटीस बजावत पुढील चार आठवड्यात केंद्र सरकारला याबाबत स्पष्टीकरण देण्यास सांगितले आहे. तसेच या पुढील सुनावणी ही बंद खोलीत पार पडेल असेही सांगण्यात आले आहे.
नगराध्यक्ष नेमणूक प्रक्रियेनंतर आता थेट सरपंच निवड प्रक्रिया देखील रद्द करण्याचा विचार असल्याची माहिती ग्राम विकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली आहे. थेट जनतेतून सरपंचाची नेमणूक होताना त्या गावातील राजकीय वर्चस्वाचा हस्तक्षेप येतो म्हणूनच ही पद्धत बदलण्याचा प्रस्ताव असल्याचे मुश्रीफ यांनी सांगितले आहे. यामुळे देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेल्या थेट निवडीच्या निर्णयाला धक्का बसणार आहे.
साईबाबा जन्मस्थळाच्या (Saibaba Birthplace) वादावरून शिर्डी (Shirdi) ग्रामस्थांसोबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांची बैठक झाल्यावर हा वाद कुठेतरी मिटेल अशी शक्यता होती मात्र बैठकीला आमंत्रण न दिल्याची नाराजी व्यक्त करत पाथरी (Pathari) ग्रामस्थांनी हा मुद्दा अजून उचलून धरला. याच पार्श्वभूमीवर आज, शिवसेना (Shivsena) खासदार संजय जाधव (Sanjay Jadhav) यांच्या सोबत पाथरी गावकरी मुंबईत मुख्यमंत्र्यांसोबत बैठक घेणार आहेत, काही वेळेपूर्वीच ही मंडळी मुंबईत दाखल झाली असून आज या बैठकीतून काय तोडगा निघतो हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. प्राप्त माहितीनुसार, पाथरी ग्रामस्थांनी साईबाबांच्या जन्माची दाखले देणारी तब्बल 29 पुरावे आपल्याकडे असल्याचा दावा केला होता. याच वादात काल बीड वासियांनी देखील उडी घेत साईबाबा हे बीड मध्ये नोकरीला होते असे म्हणत बीडच्या विकासकामासाठी सुद्धा 100 कोटींचा निधी मुख्यमंत्र्यानी द्याव्या अशी मागणी केली होती.
दुसरीकडे मुंबईतील महत्वाकांक्षी प्रकल्प मेट्रोच्या प्राधिकरणातून व्यवस्थापकीय संचालक आश्विनी भिडे यांची मंगळवारी उचलबांगडी करण्यात आली. त्यांच्या जागी रणजीत सिंह देओल यांची नियुक्ती करण्यात आली आहे. आरे वृक्षतोड वादात भिडे यांची भूमिका त्यांना आता चांगलीच भोवल्याचे दिसत आहे.
आजच्या दिवसभरातील ठळक बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचण्यासाठी 'लेटेस्टली मराठी' ला अवश्य भेट द्या
दरम्यान आज, दिल्ली मध्ये सकाळी 10.30 वाजता कॅबिनेट मंत्री मंडळाची बैठक आयोजित करण्यात आली आहे, येत्या काहीच दिवसात अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्याकडून बजेट जाहीर करण्यात येणार असल्याने तत्पूर्वी या बैठकीत काय चर्चा होणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. तर महाराष्ट्रात सुद्धा आज संध्याकाळी मंत्रिमंडळाची बैठक पार पडणार आहे, आदित्य ठाकरे यांच्या मुंबईत नाईटलाईफ सुरु करण्याच्या प्रस्तावावर या बैठकीत चर्चा होईल अशी शक्यता आहे.