Covid-19 Second Wave in India: कोरोनाविरुद्धच्या दुसऱ्या लाटेत भारताला जगभरातून मदतीसाठी पाठिंबा; पाकिस्तान ते अमेरिका अनेक देश आले पुढे
Covid 19 | Image used for representational purpose | (Photo Credits: Pixabay)

भारतात कोरोना व्हायरस (Coronavirus) संसर्गाची अभूतपूर्व अशी दुसरी लाट (Covid-19 Second Wave in India) आली आहे. या लाटेमुळे भारतातील कोरोना व्हायरस संक्रमितांची संख्या प्रचंड मोठ्या प्रमाणावर वाढते आहे. जगभरातील देशांच्या भारतातील कोरोना व्हायरस संक्रमितांची संख्या पाहता देशातील आरोग्य यंत्रणेवर प्रचंड मोठा ताण आला आहे. अशा स्थितीत जगभरतील देशांनी चिंता व्यक्त केली आहे. ही चिंता व्यक्त करतानाच जगभरातील अनेक देशांनी भारतासाठी मदतीचा हात पुढे केला आहे. यात पाकिस्तान पासून अमेरिकेपर्यंत अनेक देशांचा समावेश आहे. भारतात गेल्या तीन दिवसांपासून कोविड 19 (Covid-19) संक्रमितांची संख्या सातत्याने 2 ते 3 लाखांच्याही वरत आढळून येत आहे. त्या तुलनेत डिस्चार्ज मिळणाऱ्यांची संख्या बरीच कमी आहे. त्यामुळे चिंता वाढली आहे.

अमेरिकेच्या व्हाईट हाऊसचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जेक सुलिवान ( Jake Sullivan) यांनी ट्विटरवर आपली चिंता व्यक्त केली आहे. त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे. “भारतातील कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे अमेरिकेची चिंता आहे. आम्ही आमच्या सहकाऱ्यांना भारताला आवश्यक ती मदत देण्याचे अवाहन केले आहे''.

युनायटेड स्टेस्टसचे परराष्ट्रमंत्री अँटनी ब्लिंकेन (Antony Blinken) यांनीही भारतला पाठिंबा दर्शविला आहे. त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे, 'कोरोनाच्या या अत्यंत भयावह उद्रेकावेळी आम्ही भारतासोबत आहोत. आम्ही सध्या आमच्या देशातील संकटाशी लढत आहोत. लवकरच आम्ही भारतालाही आवश्यक ते सहकार्य करु.' (हेही वाचा, Coronavirus: 'या संकटामध्ये शत्रुत्व विसरूया, आम्हाला तुमची मदत करू द्या'; पाकिस्तानमधून पीएम नरेंद्र मोदी यांना पत्र)

फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनीही म्हटले आहे की, कोरोना विरुदधच्या लढ्यात फ्रान्स भारतासोबत आहे. आम्ही शक्य ती मदत करु.

भारतीय-अमेरिकन कॉंग्रेसचे सदस्य राजा कृष्णमूर्ती यांनी अमेरिकेचे अध्यक्ष जो बिडेन (US President Joe Biden) यांना सांगितले की, सध्या जगभरातील अनेक देशांसाठी Oxford AstraZeneca Vaccine चे डोस खुले करा. यात जगभरातील अनेक देशांप्रमाणे भारताचाही समावेश असावा.

पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान यांनी म्हटले आहे की, भारतातील वाढती कोरोना व्हायरस संक्रमितांची संख्या चिंताजनक आहे. आम्हाला मतभेद विसरुन भारतीयांसोबत कोरोना विरुद्ध एकत्र काम करण्याची इच्छा आहे. आम्ही प्रार्थना करतो की, भारत या संकटातून लवकर बाहेर पडो.

कोरोना नियंत्रणासाठी भारतात मोठ्या प्रमाणावर प्रयत्न केले जात आहे. त्यासाठी लसीकरण मोठ्या प्रमाणावर वाढवण्यात येत आहे. परंतू,  लसीचा तुटवडा असल्यामुळे लसीकरण करण्यासाठी अडचण येत आहे. भारत सध्या लस आणि ऑक्सिजन पुरवठ्यावर काम करतो आहे.