Subramanian Swamy On Corona Vaccination: राज्यनिहाय पर्याय उभा करा आणि भाजप सरकारला परिणाम दाखवा: सुब्रमण्यम स्वामी
Subramanian Swamy |(Photo Credits: Facebook)

भाजप नेते सुब्रमण्यम स्वामी (Subramanian Swamy) यांनी पुन्हा एकदा आक्रमक होत आपली भूमिका मांडली आहे. राष्ट्र सध्या अत्यंत गंभीर टप्प्यावर आहे. या गंभीरटप्प्यांबाबत मी आधीच सांगितले आहे. यात कोरोना व्हायरस (Coronavirus), अर्थव्यवस्था आणि शेजारी देश चीनची वाढती आक्रमकता हे मुद्दे प्रामुख्याने आहेत. आता शेतकऱ्यांचे आंदोलनही अधिक संघर्षमय होण्याची चिन्हे आहेत. याला पर्याय एकच देशातील राज्य सरकारांकडून राज्यनियाह पर्याय उभा राहिला पाहिजे. त्याचा संयुक्त परिणाम भाजप सरकारला (BJP Government) दाखवून दिला पाहिजे, असे खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी म्हटले आहे. स्वामी यांनी ट्विटरच्या माध्यमातून आपली भूमिका मांडली आहे.

दरम्यान, भाजप नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी रविवारीही 23 मे अशाच प्रकारचे ट्विट करत केंद्रातील आपल्याच पक्षाच्या मोदी सरकारवर जोरदार टीका केली होती. स्वामी यांनी म्हटले होते की, देशातील बिगरभाजप शासीत राज्ये कोरोना विरुद्ध लढण्यासाठी आणि लस मिळविण्यासाठी एकत्र येऊ शकतात. ही राज्ये एकत्र यऊन विदेशातून लस मागवतील आणि त्याचे बील केंद्रातील मोदी सरकारला पाठवतील. राजकीय पातळीवर मोदी सरकार हे बिल नाकारु शकत नाहीत. ती जोखीम मोदी सरकार उचलू शकत नाही. त्यामुळे राज्यांना हा पर्याय असल्याचे सुब्रमण्यम स्वामी यांनी सूचवले होते.

देशभरातून अनेक राज्यांमधून येत असलेल्या कोरोना लसींच्या तुटवड्याबाबत सुब्रमण्यम स्वामी यांनी केलेले ट्विट पाहून अनेकांना आश्चर्य वाटले आहे. अर्थात सुब्रमण्यम स्वामी हे भाजपचे ज्येष्ठ नेते असले तरी ते सुरुवातीपासूनच बिनधास्त म्हणून ओळखले जातात. त्यामुळे अनेकदा ते केंद्र सरकारवर जाहीर टीकास्त्र सोडताना दिसतात. कधी कधी ते पक्षाच्या चौकटीबाहेर जाऊनही केंद्र सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडत असतात.

दरम्यान, देशातील अनेक राज्यांमध्ये लसींचा तुटवडा आहे. त्यामुळे अनेक राज्यांनी केंद्र सरकारला पत्र लिहीले आहे. काही राज्यांनी जागतिक पातळीवरुन लस उपलब्ध होते आहे का यासाठी प्रयत्न सुरु केले आहेत. त्यासाठी या राज्यांनी ग्लोबल टेंडरही काढले आहे. त्यामुळे येत्या काळात राज्य विरुद्ध केंद्र असा सामना रंगण्याची चिन्हे आहेत.