Assembly Elections 2022: पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीची घोषणा केव्हाही होण्याची शक्यता, आयोगाच्या बैठकीकडे सर्वाचे लक्ष
Gram Panchayat Elections | (File Image)

देशात कोरोना व्हायरस महामारी पुन्हा एकदा नव्या स्ट्रेनसह वाढत असतानाच दुसऱ्या बाजूला पाच राज्यांमध्ये विधानसभा (Assembly Elections 2022) निवडणुकांची रणधुमाळी सुरु होण्याची शक्यता आहे. भारतीय निवडणूक आयोगाची आज (6 जानेवारी) एक महत्त्वपूर्ण बैठक पार पडत आहे. या बैठकीनंतर उत्तर प्रदेश (Uttar Pradesh), उत्तराखंड (Uttarakhand), मणिपूर (Manipur), गोवा (Goa) आणि पंजाब (Punjab) या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांबाबत अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे. आज दिवसभरात किंवा नजीकच्या काळात या राज्यांतील निवडणुकांची घोषणा केव्हाही होऊ शकते, अशी चिन्हे आहेत. त्यामुळे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निवडणुकांबाबत निवडणूक आयोग काय भूमिका घेतो याबाबत उत्सुकता आहे.

पाच राज्यांच्या निवडणुकांबाबत निवडणूक आयोगाकडून पाठिमागील काही दिवसांपासून बठकांचा सिलसिला सुरु आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अनेक मार्गदर्शक तत्वे, नियम आणि अटी लागू करत निवडणूक आयोग निवडणूक कार्यक्रमाची घोषणा करण्याची शक्यता आहे. जसे की, मतदान केंद्रांची संख्या वढवून प्रत्येक मतदान केंद्रांवर मतदारांची संख्या कमी राही याबाबत दक्षता घेणे. दोन मतदारांमध्ये मतदानाचा कालावधी वाढवणे. निवडणूक प्रचारांवर मर्यादा. व्हर्च्युअल प्रचारांवर भर. मोठ्या रॅली, सभा यांवर मर्यादा. गर्दी नियंत्रणाची जबाबदारी यांसारख्या अनेक गोष्टींवर निवडणूक आयोग विचार करु शकतो. (हेही वाचा, Uttar Pradesh Assembly Elections 2022: शिवसेनेची मोठी घोषणा! उत्तर प्रदेश विधानसभेच्या आगामी निवडणुकीतील सर्व जागा लढण्याचा घेतला निर्णय)

निवडणुका पार पडणारी राज्ये

  • उत्तर प्रदेश
  • उत्तराखंड
  • मणिपूर
  • गोवा
  • पंजाब

दरम्यान, भारतात पाठीमागील 24 तासात 90,928 जणांना कोरोना व्हायरस संसर्ग झाला आहे. 19,206 जण उपचार घेऊन बरे झाले आहेत. तर, 325 जणांचा मृत्यू झाला आहे. दैनिक पॉझिटीव्हीटीचा दर 6.43% इतका राहीला आहे. देशात सक्रिय असलेल्या रुग्णांची संख्या 2,85,401 इतकी आहे. आतापर्यंत 3,43,41,009 जण कोरोनामुक्त झाले आहेत. तर 4,82,876 नागरिकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. देशात आतापर्यंत 148.67 नागरिकांचे लसीकरण झाले आहे.