Abdul Sattar Controversial Statement: अब्दुल सत्तार यांच्या विधानावर अजित पवार यांची प्रतिक्रिया अपेक्षीत नाही- जयंत पाटील
सत्तार यांनी सुप्रिया सुळे यांच्याबद्दल काढलेल्या उद्गारावरुन अजित पवार यांनी प्रतिक्रिया देणे अपेक्षीत नाही. आपल्या बहिणीबद्दल एखाद्याने अशा प्रकारचे उद्गार काढल्यानंतर अजित पवार आणि संपूर्ण कुटुंबीयांना वाईट वाटणे स्वाभाविक आहे. परंतू, अजित पवार यांनी याबाबत काय प्रतिक्रिया द्यायची? असा मुद्दा येतो, त्यामुळे अजित पवार यांची प्रतिक्रिया अपेक्षीत नाही- जयंत पाटील
कृषीमंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांनी खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांच्याबद्दल काढलेल्या उद्गाराबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्षाचे नेते अजित पवार (Ajit Pawar) यांची प्रतिक्रिया पुढे आली नाही. यावरुन प्रसारमाध्यमांसह अनेकांकडून कुतूहल व्यक्त केले जात आहे. याबातब राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. सत्तार यांनी सुप्रिया सुळे यांच्याबद्दल काढलेल्या उद्गारावरुन अजित पवार (यांनी प्रतिक्रिया देणे अपेक्षीत नाही. आपल्या बहिणीबद्दल एखाद्याने अशा प्रकारचे उद्गार काढल्यानंतर अजित पवार आणि संपूर्ण कुटुंबीयांना वाईट वाटणे स्वाभाविक आहे. परंतू, अजित पवार यांनी याबाबत काय प्रतिक्रिया द्यायची? असा मुद्दा येतो. त्यामुळे त्यांनी प्रतिक्रिया देणे अपेक्षीत नसले तरी पक्षाने याबाबतची भूमिका घेतली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी सत्तार यांना मंत्रिमंडळातून काढून टाकावे, अशी आमची भूमिका आहे.
अब्दुल सत्तार यांच्या विधानाची तातडीने गंभीर दखल घेत त्यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करण्यात यावी. यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे एक शिष्टमंडळ जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांना जाऊन भेटले. त्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना जयंत पाटील म्हणाले, राज्यामध्ये एखाद्या नेत्याबद्दल अशा पद्धतीने बोलण्याची पद्धत नाही. राज्याच्या राजकारणात एकमेकांना अरे-तुरे करुनही बोलले जात नाही. ही अलिकडेच अशी पद्धत आली आहे. त्यामुळे सत्तार यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी. सत्तेमध्ये सरकारे येतात जातात. परंतू, सत्तेसाठी कोणाची ओझी वाहायची यालाही काही मर्यादा असतात. देवेंद्र फडणवीस यांनी याबातब भूमिका स्पष्ट करावी. अब्दुल सत्तार यांचा राजीनामा घ्यावी अशी आमची मागणी आहे. त्यांचा राजीनामा झाल्यास आम्ही समजू की सत्तार यांची भूमिका खरोखरच भाजपला अमान्य आहे. त्यांचा राजीनामा घेतला नाही तर मात्र भाजपचा सत्तार यांच्या विधानाला पाठिंबा आहे, असाच आर्थ त्यातून निघतो, असेही जयंत पाटील म्हणाले. (हेही वाचा, Abdul Sattar Controversial Statement: अब्दुल सत्तार यांच्या राजीनाम्यावरुन वाढता दबाव, विरोधक आक्रमक, CM एकनाथ शिंदे, DCM देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर आव्हान)
ट्विट
दरम्यान, राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्याबद्दल केलेल्या वादग्रस्त विधानामुळे राज्याभर असंतोष पाहायला मिळत आहे. या असंतोषातूनच अब्दुल सत्तार यांनी मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा अथवा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तो घ्यावा, अशी जोरदार मागणी होऊ लागली आहे. प्रामुख्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासह विरोधी पक्षात असलेले सर्वच राजकीय पक्ष विशेष आक्रमक झाले आहेत. त्यांनी सत्तार यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. त्यामुळे अब्दुल सत्तार यांच्या राजीनाम्यासाठी दबाव वाढतो आहे. या दबावामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोरआव्हान निर्माण झाले आहे.