9 years of PM Modi Government: पीएम नरेंद्र मोदी सरकारची 9 वर्षे; BJP ची 250 मतदारसंघात 50 रॅलींची योजना
भाजप (संग्रहित प्रतिमा)

देशात सत्तेत असलेल्या पीएम नरेंद्र मोदी सरकारला (PM Narendra Modi Government) 9 वर्षे पूर्ण होत आहेत. या गोष्टीचे औचित्य साधत भाजपने (BJP) अनेक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी 31 मे रोजी त्यांच्या सरकारच्या नवव्या वर्धापन दिनानिमित्त महिनाभर चालणाऱ्या उत्सवाची सुरुवात करण्यासाठी एका जाहीर सभेला संबोधित करतील. सरकारला 9 वर्षे पूर्ण होत असल्याच्या निमित्ताने 30 मे ते 30 जून दरम्यान जनसंपर्क मोहीम होणार आहे व ती यशस्वी करण्यासाठी भारतीय जनता पक्षाने विस्तृत योजना आखल्या आहेत.

मोदी सरकारची 9 वर्षे साजरी करण्यासाठी भाजपने 250 मतदारसंघात 50 रॅलींचे आयोजन केले आहे. यासाठी पीएम मोदींच्या पहिल्या रॅलीचे ठिकाण निश्चित केले जात आहे. ते राजस्थान, हरियाणा किंवा पश्चिम उत्तर प्रदेशात असू शकते. अहवालानुसार राजस्थानच्या अजमेर येथे पीएम मोदींचे भाषण होईल. यावेळी पीएम मोदी जाहीर सभेदरम्यान एक थीम सॉन्ग लाँच करतील आणि महिनाभरातील सर्व कार्यक्रमांमध्ये ते पुन्हा प्ले केले जाईल.

त्यानंतर महिनाभरात 250 हून अधिक लोकसभा मतदारसंघात गृहमंत्री अमित शहा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जगत प्रकाश नड्डा आणि पक्षाचे इतर वरिष्ठ नेते जनतेला संबोधित करतील. यासाठी पन्नास रॅलींचे नियोजन केले आहे. पीएम मोदी आणखी सभांना संबोधित करू शकतात, असेही सांगितले जात आहे. चार ते पाच लोकसभा मतदारसंघांचा एक गट केला असून, या प्रत्येक गटामध्ये एक रॅली होईल. 23 जून रोजी श्यामा प्रसाद मुखर्जी यांच्या पुण्यतिथीनिमित्त, पीएम मोदी 10 लाखांहून अधिक लोकांशी जोडण्यासाठी डिजिटल रॅलीला संबोधित करतील. (हेही वाचा: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कुडोस बँक एरिना येथे पारंपरीक पद्धतीने स्वागत)

यासह 25 जून रोजी, पंतप्रधानांचा मन की बात रेडिओ कार्यक्रम आहे. त्यावेळी देशात आणीबाणी लागू होण्याला 48 वर्षे पूर्ण होत आहेत. आपल्या मन की बात कार्यक्रमात पीएम मोदी आणीबाणीवर बोलतील. दरम्यान, भाजपने 2024 च्या लोकसभा निवडणुकीची तयारीही सुरू केली आहे. पहिल्या टप्प्यात प्रत्येक लोकसभा मतदारसंघातील एका विधानसभा मतदारसंघात किमान दहा हजार लोकांची रॅली काढण्यात येणार आहे. यामध्ये स्थानिक खासदार, आमदार आणि इतर लोकप्रतिनिधींचा समावेश असेल. या रॅलीला राज्य किंवा केंद्र सरकारचे मंत्री किंवा पक्षाचे पदाधिकारी संबोधित करतील.