मुलांच्या पाठीवरील ओझं होणार कमी, पहिली, दुसरीच्या मुलांना गृहपाठ देणं टाळा - केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाचे राज्यांना आदेश
School Bags (Photo credits: PTI)

आजकाल चिमुकल्या शाळकरी मुलांच्या पाठीवर त्यांच्या वजनाइतकेच दप्तराचं ओझं असतं. यामुळे पाठीच्या कणाच्या आजारपणापासून अनेक दुखण्यांचा धोका वाढत आहे. विविध माध्यमातून शाळकरी मुलांच्या दप्तराच्या वजनाबाबत अनेकांनी प्रश्न उपस्थित केले होते. अखेर आता दप्तराच्या वजनाबाबत सरकारने एक महत्त्वपूर्ण घोषणा केली आहे.

मनुष्यबळ आणि विकास मंत्रालयाने (Ministry of Human Resource and Development ) दिलेल्या माहितीनुसार, प्रत्येक राज्याच्या शिक्षण विभागाने अभ्यास, दप्तराचं वजन आणि शिक्षणपद्धती यांच्याबाबत गाईडलाईन्स आणि नियमावलीचं पालन सक्तीचं केलं आहे. यामुळे सध्याच्या नियमांनुसार मुलांच्या शाळेच्या दप्तराचं वजन हे पहिली आणि दुसरीच्या वर्गासाठी सुमारे 1.5 किलो असणं आवश्यक आहे. तर आठवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांच्या पाठीवरील वजन 5 किलोपेक्षा अधिक नसावं.

मनुष्यबळ मंत्रालयाने( Ministry of Human Resource and Development )जाहीर केलेल्या नोटिसेनुसार, पहिली आणि दुसरीच्या विद्यार्थ्यांना गृहपाठ देणं टाळावे. मुलांच्या पाठीवरील वजनात भर पडेल अशा अधिकच्या वह्या,पुस्तकांची ने-आण करण टाळावे. असेही सांगण्यात आले आहे. सोबतच या आदेशांना तात्काळ स्विकारण्याचं आवाहनदेखील करण्यात आलं आहे.

आजकाल वाढत्या स्पर्धेच्या युगात मुलांना टिकून राहता यावं करिता शाळेसोबतच ट्युशन, एक्स्ट्रा करिक्युलर अ‍ॅक्टिव्हिटी , छंदवर्ग यांचा मुलांवर मारा केला जातो. त्यामुळे शाळेच्या वह्या-पुस्तकांसोबत मुलांकडे इतर क्लासच्या साहित्याचंही ओझं असत.