Kerala Food Poisoning: केरळमध्ये बिर्याणीतून 178 जणांना विषबाधा, एका महिलेचा मृत्यू; अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांकडून तपासणी सुरू
बिर्याणीतून 178 जणांना विषबाधा झाल्याची घटना केरळमधून समोर आली आहे. या घटनेत एका महिलेला जीव गमवावा लागला आहे. सर्वांना जुलाब, उलट्यांचा त्रास होत होता. त्यांच्यावर जिल्ह्यातील विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
Kerala Food Poisoning: केरळमध्ये 178 जणांना अन्नातून विषबाधा झाल्याचे समोर आले आहे. केरळमधील त्रिशूरमध्ये ही घटना घडली. बिर्याणी खाल्यानंतर सर्वांना उलट्या, जुलाब, मळमळ, असे त्रास जाणवू लागले होते. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ज्या रेस्टॉरंटमधून बिर्याणी खाल्ली गेली, तेथे आरोग्य विभागाचे अधिकारी आणि अन्न सुरक्षा विभागाच्या प्रतिनिधींकडून तपासणी सुरू आहे. उझैबा असे 56 वर्षीय मृत महिलेचे नाव आहे. बिर्याणी खाल्ल्यानंतर त्यांना पोटदुखी आणि उलट्या होऊ लागल्याने त्रिशूर मेडिकल कॉलेजमध्ये त्यांना दाखल करण्यात आले होते. वैद्यकीय उपचार मिळूनही त्यांची प्रकृती खालावत होती. त्यातच त्यांचा मृत्यू झाला. शनिवारी 25 मे रोजी संध्याकाळी ही घटना घडली. (हेही वाचा: Pune Food Poisoning: खेडमध्ये 50 हून अधिक विद्यार्थ्यांना विषबाधा; पोटदुखी, उलट्यांच्या त्रासामुळे रुग्णालयात दाखल)
इकॉनॉमिक टाईम्सच्या वृत्तानुसार, पंचायत अध्यक्ष, विनीता मोहनदास यांनी सांगितले की, जे नागरिक आजारी पडले होते त्यांना कोडुंगल्लूर आणि इरिंगलाकुडा येथील विविध रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. रेस्टॉरंट अस्वच्छ परिस्थितीत होते. तपासणी दरम्यान खूप अस्वच्छता तेथे होती. तपासणीत हे सत्य समोर आल्यानंतर रेस्टॉरंट त्वरित बंद करण्यात आले.