कर्मचारी भविष्य निर्वाह निधी खाते कधी 'निष्क्रिय' होते? वेळीच समजून घ्याव्यात या 4 महत्त्वाच्या बाबी

कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने (ईपीएफओ) आपल्या अधिकृत सोशल मीडिया पोस्टद्वारे ईपीएफ खाते कोणत्या परिस्थितीत निष्क्रिय होते आणि व्याज मिळणे कधी बंद होते, याबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे.

नोकरी सोडली किंवा बदलली म्हणजे लगेच कर्मचारी भविष्य निर्वाह निधी खाते (EPF account) निष्क्रिय होते, असा अनेकांचा गैरसमज असतो. प्रत्यक्षात मात्र खाते निष्क्रिय होण्यासाठी काही निश्चित अटी आणि 36 महिन्यांचा कालावधी लागू असतो. या पार्श्वभूमीवर कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने (EPFO) 20 ऑगस्ट रोजी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर एक पोस्ट प्रसिद्ध करत खातेधारकांना याबाबत सविस्तर माहिती दिली आहे.

EPFO ची पोस्ट काय सांगते

ईपीएफओने आपल्या पोस्टमध्ये "निष्क्रिय ईपीएफ खात्यांचे कोडे उलगडूया. तुमचे ईपीएफ खाते व्याज मिळवणे कधी थांबवते हे जाणून घ्या आणि त्यानुसार पैसे काढण्याचे नियोजन करा" असे नमूद केले आहे. खातेधारकांनी जुनी ईपीएफ शिल्लक निष्क्रिय झाली आहे असे गृहीत धरण्यापूर्वी समजून घ्याव्यात अशा चार महत्त्वाच्या परिस्थिती या पोस्टमध्ये अधोरेखित करण्यात आल्या आहेत.

निवृत्तीनंतर खाते कधी निष्क्रिय होते?

नियमानुसार, 55 वयानंतर निवृत्त झालेल्या सदस्याचे ईपीएफ खाते निवृत्तीनंतर तीन वर्षांनी निष्क्रिय होते आणि त्यानंतर त्यावर व्याज मिळणे बंद होते. म्हणजेच 55 वयानंतर निवृत्त झालेल्या व्यक्तीला त्याच्या खात्यावरील व्याज 58 वयापर्यंत मिळत राहते.

लवकर निवृत्ती घेतल्यास वेगळा नियम

55 वयापूर्वी निवृत्ती घेतल्यास (लवकर निवृत्ती) ईपीएफ खाते लगेच निष्क्रिय होत नाही. अशा प्रकरणांमध्ये सदस्य 58 वयाचा होईपर्यंत खात्यावर व्याज मिळत राहते. सदस्य 58 वर्षांचा झाल्यानंतरच हे खाते निष्क्रिय गणले जाते.

खातेधारकांनी काय करावे ?

पात्र सदस्यांनी जुनी ईपीएफ शिल्लक दुर्लक्षित न करता, नोकरीची व यूएएन क्रमांकाची माहिती अद्ययावत ठेवणे आवश्यक आहे. तसेच पात्र असल्यास शिल्लक रक्कम नव्या खात्यात हस्तांतरित करणे आणि आवश्यकतेनुसार पैसे काढण्याचा दावा वेळीच दाखल करणे यामुळे खाते निष्क्रिय होण्यापासून टाळता येऊ शकते. नक्की वाचा: कर्मचारी भविष्यनिर्वाह निधी संघटनेचे नवे 'सर्व्हिस हिस्ट्री' फीचर, आता एकाच ठिकाणी दिसणार तुमचे सर्व जुने अकाउंट्स

जमा रकमेचे काय होते ?

नियमांनुसार खात्यात जमा झालेली रक्कम पात्र सदस्यांना काढून घेता येते. ईपीएफओने दिलेले हे स्पष्टीकरण 36 महिन्यांचा कालावधी नेमका कधी सुरू होतो आणि प्रत्यक्षात व्याज मिळणे कधी थांबते, हे समजून घेण्यासाठी उपयुक्त ठरणारे आहे. नक्की वाचा: कर्मचारी भविष्यनिर्वाह निधी मधून पैसे काढण्याचे नियम बदलले; पहा संपूर्ण पीएफ रक्कम कधी काढता येते? 

अलीकडेच सरकारने दिलेल्या माहितीनुसार, देशभरात सुमारे एकवीस लाख ईपीएफ खाती निष्क्रिय असून त्यामध्ये सुमारे 8500 कोटी रुपयांची रक्कम अडकून आहे. अनेक खातेधारकांना नोकरी बदलल्यानंतर जुन्या खात्यातील रक्कम नव्या खात्यात हस्तांतरित करण्याचे महत्त्व लक्षात येत नाही, त्यामुळे मोठ्या प्रमाणात रक्कम निष्क्रिय खात्यांमध्ये पडून राहते. या पार्श्वभूमीवर ईपीएफओने वेळोवेळी दिलेल्या स्पष्टीकरणांमुळे खातेधारकांना आपल्या हक्काच्या पैशांचे योग्य नियोजन करणे सोपे जाणार आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement