Agni Veer Rally Ahmednagar: अहमदनगरमध्ये उद्यापासून अग्निवीर भरती रॅली; 68 हजार उमेदवारांनी केली नोंदणी

पुणे रिक्रूटिंग झोन अशा एकूण आठ भरती मेळाव्याचे आयोजन करणार आहे, ज्यामध्ये अग्निवीर महिला सैनिकांसाठी एका रॅलीचा समावेश आहे. येत्या चार महिन्यांत महाराष्ट्र, गुजरात, गोवा, दादर आणि नगर हवेली आणि दमण आणि दीव येथे हे आठ मेळावे होणार आहेत.

Agni Veer Rally Ahmednagar: अहमदनगरमध्ये उद्यापासून अग्निवीर भरती रॅली; 68 हजार उमेदवारांनी केली नोंदणी
Indian Army (Photo Credits-Twitter)

महाराष्ट्रातील अहमदनगर (Ahmednagar) येथे होणाऱ्या अग्निवीर भरती मेळाव्यासाठी (Agni Veer Rally) 68 हजार उमेदवारांनी नोंदणी केली आहे. भारतीय लष्कराने सोमवारी ही माहिती दिली. भारतीय लष्कराने सांगितले की, राहुरी, अहमदनगर येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठ येथे 23 ऑगस्ट (मंगळवार) ते 11 सप्टेंबर या कालावधीत होणाऱ्या दुसऱ्या अग्निवीर भरती मेळाव्यासाठी त्यांच्या पुणे कार्यालयात 68,000 उमेदवारांनी नोंदणी केली आहे. पुणे रिक्रूटमेंट ऑफिसच्या वतीने 13 ऑगस्टपासून औरंगाबादमध्ये अशा प्रकारची भरती आयोजित केली जात आहे.

अहमदनगर रॅलीसाठी अग्निवीर जनरल ड्युटी, अग्निवीर टेक्निकल, अग्निवीर लिपिक, स्टोअरकीपर, टेक्निकल आणि अग्निवीर ट्रेड्समन या श्रेणींची नोंदणी करण्यात आल्याचे लष्कराच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. रॅलीसाठी अहमदनगर, बीड, लातूर, उस्मानाबाद, पुणे आणि सोलापूर येथील उमेदवारांनी नोंदणी केली आहे. अधिकाऱ्यांनी सांगितले की, सर्व उमेदवारांना प्रवेशपत्रे आधीच देण्यात आली आहेत.

राहुरीत ही रॅली यशस्वीपणे पार पाडण्यासाठी अहमदनगर जिल्हा प्रशासन आणि स्थानिक अधिकाऱ्यांनी पूर्ण सहकार्य केल्याचे लष्कराने एक निवेदन जारी केले आहेव. जिल्हा प्रशासनाकडून त्यांच्यासाठी अन्न, पाणी आणि झोपेची पुरेशी व्यवस्था करण्यात आल्याचे लष्कराने सांगितले. लष्कराकडून जारी करण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, दररोज 5000 उमेदवार रॅलीत पोहोचण्याची अपेक्षा आहे. (हेही वाचा: आणखी 3 ते 6 महिन्यांपर्यंत मिळू शकते मोफत अन्नधान्य; PMGKAY ची मुदत वाढण्याची शक्यता)

उमेदवारांची वैद्यकीय तपासणी करण्यासाठी लष्कराच्या डॉक्टरांचे पथक राहुरीत तैनात करण्यात आले आहे. निवेदनात, सर्व सहभागींनी त्यांची आवश्यक कागदपत्रे सोबत आणण्याची सूचना केली आहे. जूनमध्ये संरक्षण मंत्रालयाने तीन सेवांमध्ये सैनिकांच्या भरतीसाठी नवीन अग्निपथ उपक्रम जाहीर केला होता. या प्रक्रियेअंतर्गत चार वर्षांच्या कालावधीसाठी सैनिकांची भरती केली जाईल आणि यातील 25 टक्के सैनिक नियमित केडरमध्ये भरती होतील, ज्यांना 15 वर्षे देशसेवेची संधी मिळेल.

पुणे रिक्रूटिंग झोन अशा एकूण आठ भरती मेळाव्याचे आयोजन करणार आहे, ज्यामध्ये अग्निवीर महिला सैनिकांसाठी एका रॅलीचा समावेश आहे. येत्या चार महिन्यांत महाराष्ट्र, गुजरात, गोवा, दादर आणि नगर हवेली आणि दमण आणि दीव येथे हे आठ मेळावे होणार आहेत.

(The above story first appeared on LatestLY on Aug 22, 2022 09:28 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).