Photo Credit- X

Chandrababu Naidu on Tirupati: तिरुपती मंदिरातील प्रसादात (Tirumala Tirupati Devasthanam Prasadam) वापरण्यात येणारे तूप आणि इतर पदार्थांमध्ये प्राण्यांची चरबी, माशाचे तेल (Beef Tallow, Fish Oil) आढळल्याचा धक्कादाक प्रकार समोर आला आहे. प्रसादाची तपासनी प्रयोगशाळेत केली असता प्रसादात प्राण्यांच्या चरबीचे अंश आढळून आल्याचे सांगितले जात आहे. मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू (N Chandrababu Naidu) यांच्या तेलगू देसम पक्षाने (Telugu Desam Party) दावा केला आहे. त्यामुळे सर्वच स्तरातून तिरुपती मंदिर ट्रस्ट आणि प्रसाद बनवण्याच्या प्रक्रीयेवर संताप व्यक्त केला जात आहे. (हेही वाचा: Ram Nath Kovind On Tirupati Laddus Row: 'हे हिंदू धर्मात पाप केल्यासारखे आहे'; तिरुपती मंदिर प्रसाद वादावर रामनाथ कोविंद यांची प्रतिक्रिया)

या सर्व प्रकरणानंतर मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी राज्यातील सर्वच मंदिरांमध्ये लवकरच स्वच्छता प्रक्रिया केली जाईल, असे म्हटले आहे. तिरुपती लाडूंमध्ये प्राण्यांच्या चरबीचा आरोप झाल्यानंतर देशातील जागृत देवस्थानात नागरिकांच्या भावनांशी खेळ होत असल्याचा आरोप होत आहे. त्यावर शनिवारी चंद्राबाबू नायडू यांनी मंदिरांमध्ये स्वच्छता प्रक्रिया राबवली जाणार असल्याचे सांगितले.

तेलुगु देसम पार्टी (टीडीपी) केंद्रीय कार्यालयात माध्यमांशी संवाद साधताना मुख्यमंत्र्यांनी धार्मिक भावनांचा आदर करण्याच्या सरकारच्या वचनबद्धतेवर जोर दिला, त्याशिवाय, नेत्यांशी सल्लामसलत केल्यानंतर योग्य ती कारवाई करण्याचे वचन दिले. चंद्राबाबू नायडू यांनी सांगितले की, तिरुमला प्रकरणाशी संबंधित आवश्यक पावले आणि त्यांच्या अंमलबजावणीबाबत चर्चा सुरू आहे.

'तिरुपती लाडू वादाला उत्तर देण्यासाठी जीर स्वामी, कांची स्वामी आणि इतर धार्मिक नेत्यांशी सल्लामसलत केल्यानंतर लवकरच निर्णय घेतला जाईल,' असे ते म्हणाले. चंद्राबाबू नायडू यांनी तिरुपती लाडू वादावर वायएसआरसीपीवर आरोप केले आहे. या प्रकरणाला वायएसआरसीपीने राजकीय वळण देण्याचा प्रयत्न केल्याचे त्यांनी म्हटले. त्याशिवाय, काँग्रेस पक्षाच्या राजवटीत खरेदी केलेल्या तुपात फिश ऑइल आणि बीफ टॅलो सापडले असल्याचा दावा त्यांनी केला आहे.