Akshay Kumar Untitled Film

बॉलिवूडमधील बहुप्रतिक्षित चित्रपट हेरा फेरी 3 (Hera Pheri 3) च्या निर्मितीला अनेक अडथळ्यांचा सामना करावा लागत आहे. नुकतेच अभिनेता परेश रावल (Paresh Rawal) यांनी या चित्रपटातून अचानक बाहेर पडण्याचा निर्णय घेतल्याने खळबळ उडाली आहे. यानंतर परेश रावल यांनी त्यांचे मानधनही परत केल्याचे समोर आले होते. आता मुंबईत एका पत्रकार परिषदेत, चित्रपटाचा निर्माता आणि प्रमुख अभिनेता अक्षय कुमार (Akshay Kumar) याने प्रथमच या विषयावर आपले मौन सोडले. त्यांने परेश रावल यांना ‘माझा चांगला मित्र’ आणि ‘उत्तम अभिनेता’ असे संबोधून त्यांच्याबाबत आदर व्यक्त केला, परंतु हा मुद्दा ‘गंभीर’ असल्याचेही नमूद केले.

मुंबईत हाउसफुल 5 च्या ट्रेलर लॉन्चदरम्यान पत्रकारांनी परेश रावल यांच्या हेरा फेरी 3 मधून बाहेर पडण्याबाबत प्रश्न विचारला. एका पत्रकाराने परेश यांच्या निर्णयाला ‘मूर्खपणाचा’ म्हटल्यावर अक्षयने तीव्र आक्षेप नोंदवला. त्यांनी सांगितले, ‘माझ्या सहकलाकारासाठी ‘मूर्ख’ हा शब्द वापरणे मला मान्य नाही. आम्ही गेल्या 30-32 वर्षांपासून एकत्र काम करत आहोत. आम्ही खूप चांगले मित्र आहोत, आणि परेश एक अप्रतिम अभिनेता आहे. हा विषय गंभीर आहे, आणि याबाबत मी येथे जास्त बोलणार नाही. कायदेशीर बाबी न्यायालयात हाताळल्या जातील.’ अक्षयच्या या प्रतिक्रियेमुळे त्याचा परेश यांच्यावरील आदर आणि त्याचवेळी निर्माता म्हणून त्यांची व्यावसायिक भूमिका स्पष्ट झाली.

Hera Pheri 3 Controversy:

परेश रावल यांनी 18 मे 2025 रोजी सोशल मीडियावर जाहीर केले की, ते हेरा फेरी 3 मधून बाहेर पडत आहेत. त्यांनी यामागे दिग्दर्शक प्रियदर्शन यांच्याशी कोणतेही सर्जनशील मतभेद नसल्याचे स्पष्ट केले, परंतु चित्रपटाच्या पटकथेचा अभाव आणि त्यांच्या भूमिकेच्या स्पष्टतेचा अभाव हे कारण असल्याचे सांगितले. परेश यांनी चित्रपटासाठी 11 लाख रुपयांचे साइनिंग अमाउंट घेतले होते, जे त्यांनी 15% व्याजासह परत केले आहे. मात्र, अक्षय कुमार याच्या केप ऑफ गुड फिल्म्स या निर्मिती कंपनीने परेश यांच्यावर 25 कोटी रुपयांचा दावा ठोकला आहे, कारण त्यांच्या अचानक बाहेर पडण्यामुळे चित्रपटाच्या निर्मितीला आर्थिक आणि लॉजिस्टिक नुकसान झाले. (हेही वाचा: Akshay Kumar Sues Paresh Rawal: परेश रावल Hera Pheri 3 मधून अचानक बाहेर पडल्याने वाद वाढला; अक्षय कुमारने ठोकला 25 कोटींचा दावा- Reports)

अक्षयच्या कायदेशीर प्रतिनिधी, पूजा तिडके यांनी सांगितले की, परेश यांनी मार्च 2025 मध्ये करारावर स्वाक्षरी केली होती, आणि एप्रिलमध्ये त्यांनी अक्षय आणि सुनील शेट्टी यांच्यासोबत ट्रेलर आणि चित्रपटाच्या काही दृश्यांचे चित्रीकरणही केले होते. परेश यांच्या बाहेर पडण्यामुळे चित्रपटाच्या प्रचाराला आणि निर्मितीला मोठा धक्का बसला आहे. दुसरीकडे, परेश यांच्या वकीलांनी, हा दावा ‘अनाठायी’ असल्याचे म्हटले आहे, कारण चित्रपटाची पटकथा अंतिम नव्हती आणि चित्रपटाच्या मालकी हक्कांबाबतही वाद आहे.