बिग बीं च्या बंगल्याची ‘दीवार’ पाडण्यासाठी पालिका करणार १ महिन्याची 'प्रतिक्षा'
अमिताभ बच्चन (Photo Credits: Instagram)

बॉलिवूडचा महानायक अमिताभ बच्चन यांच्या जुहू येथील प्रतिक्षा बंगल्याची जागा रस्ता रुंदीकरणासाठी महापालिका ताब्यात घेणार असल्याचे मिडिया रिपोर्टनुसार सांगण्यात येत होते. मात्र बिग बींचे शेजारी उद्योजक के.व्ही. सत्यमूर्ती यांच्या निवासस्थानाच्या आवारातील नऊ फूट जागा ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरु झाली असून अमिताभ बच्चन यांनी १ महिन्याचा कालावधी देण्यात आला आहे.  महिन्याभरात स्वत: हून ही भिंत हटवली नाही, तर  मुंबई महापालिका कारवाई करणार असल्याचे मिडिया रिपोर्टनुसार सांगण्यात येत आहे.

गेली कित्येक वर्षे आपल्या लाडक्या महानायकाची केवळ एक झलक पाहण्यासाठी तासनतास जुहू येथील बिग बीं च्या बंगल्याबाहेर प्रतिक्षा करणारे चाहते सध्या मोठ्या संभ्रमात पडले आहेत. कारण जुहूतील संत ज्ञानेश्वर मार्गाच्या रस्ता रुंदीकरणासाठी प्रतिक्षा बंगल्याच्या आवारातील जागा पालिकेने घेतली असून त्यासंदर्भातील नोटीसही अमिताभ बच्चन यांना पाठवण्यात आली होती.

या संत ज्ञानेश्वर मार्गावर नेहमीच वाहतूककोंडी होत असते. यामुळे वाहनचालक, पादचाऱ्यांचीही गैरसोय होते. त्यामुळे पालिकेने ४५ फुटांच्या संत ज्ञानेश्वर मार्गाचे ६० फुटांपर्यंत रुंदीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे. यासंदर्भात उद्योजक सत्यमूर्ती यांनी न्यायालयात धाव घेतली होती. मात्र उच्च न्यायालयाने स्थगिती आदेश न दिल्यामुळे सत्यमूर्ती रेसिडेन्स यांच्या सात मजली इमारतीची संरक्षक भिंत पाडून जागा ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरु  केली असून अमिताभ बच्चन यांना मात्र पालिकेला १ महिन्याचा कालावधी दिला आहे. महिन्याभरात जर ही भिंत हटवली गेली नाही, तर पालिका पुढील कारवाई करणार असल्याचेही सांगण्यात येतयं.

संघर्षाच्या काळात आपल्या मित्रांच्या घरी वास्तव्यास राहिलेले अमिताभ बच्चन यांचे आजच्या घडीला मुंबईत कोट्यवधींचे ५ बंगले आहेत. त्यात प्रतिक्षा बंगला हा अमिताभ बच्चन आणि त्यांच्या चाहत्यांसाठी थोडा खास आहे. म्हणूनच बिग बी स्वत: ही भिंत हटवणार की पालिकाच कारवाई करणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.