Airtel Plans to Hike: एअरटेलच्या ग्राहकांना मोठा झटका; लवकरच महागणार सर्व रिचार्ज प्लॅन्स, अध्यक्ष Sunil Bharti Mittal यांनी दिले संकेत

सुनील भारती मित्तल यांच्या नेतृत्वाखालील भारती एअरटेलने गेल्या महिन्यात आठ सर्कलमधील 28 दिवसांच्या मोबाइल फोन सेवा योजनेसाठी त्यांच्या किमान रिचार्जची किंमत जवळपास 57 टक्क्यांनी वाढवून 155 रुपये केली आहे.

Airtel Plans to Hike: एअरटेलच्या ग्राहकांना मोठा झटका; लवकरच महागणार सर्व रिचार्ज प्लॅन्स, अध्यक्ष Sunil Bharti Mittal यांनी दिले संकेत
Airtel. (Photo Credits: Twitter)

देशातील दुसरी सर्वात मोठी दूरसंचार कंपनी भारती एअरटेल (Bharti Airtel) या वर्षाच्या मध्यात दरवाढीची घोषणा करू शकते. भारती एंटरप्रायझेसचे अध्यक्ष सुनील भारती मित्तल (Sunil Bharti Mittal) यांनी मोबाईल वर्ल्ड काँग्रेसमध्ये पत्रकारांशी बोलताना मोबाईलचे दर महागणार असल्याचे संकेत दिले आहेत. भारतीय दूरसंचार प्रमुख भारती एअरटेलचे अध्यक्ष सुनील भारती मित्तल म्हणतात की, दूरसंचार व्यवसायातील भांडवलावरील परतावा खूपच कमी आहे, त्यामुळे 2023 च्या मध्यात कंपनीला दरवाढीला सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे.

मित्तल यांनी पीटीआय-भाषेला सांगितले की, एअरटेलचा ताळेबंद चांगला आहे आणि त्यासाठी जास्त भांडवल उभारण्याची गरज नाही. परंतु या उद्योगातील गुंतवणुकीवर मिळणारा परतावा खूपच कमी आहे. हे बदलण्याची गरज आहे. भारतीय टॅरिफ योग्य होण्यासाठी आवश्यक असलेली लहान शुल्क वाढ आम्ही करणार आहोत. ही वाढ या वर्षाच्या मध्यापर्यंत होईल.

समाजातील सर्वात खालच्या स्तरावर राहणाऱ्या लोकांवर या वाढीचा काय परिणाम होईल? असे विचारले असता ते म्हणाले की, लोक इतर गोष्टींवर करत असलेल्या खर्चाच्या तुलनेत ही वाढ कमी आहे. कर्मचाऱ्यांचे पगार वाढले आहे, भाडे वाढले आहे, कोणाचीही तक्रार नाही. लोक अगदी कमी शुल्कात 30 GB डेटा वापरत आहेत. त्यामुळे दरवाढीमुळे समाजातील खालच्या स्तरातील लोकांवर परिणाम होऊ शकतो याविषयी ते असहमत आहेत. (हेही वाचा: WhatsApp New Feature: आता तुम्ही इमेजला स्टिकर्समध्ये बदलू शकणार; जाणून घ्या कसे)

सुनील भारती मित्तल यांच्या नेतृत्वाखालील भारती एअरटेलने गेल्या महिन्यात आठ सर्कलमधील 28 दिवसांच्या मोबाइल फोन सेवा योजनेसाठी त्यांच्या किमान रिचार्जची किंमत जवळपास 57 टक्क्यांनी वाढवून 155 रुपये केली आहे. कंपनीने आपला 99 रुपयांचा किमान रिचार्ज प्लॅन बंद केला आहे, ज्या अंतर्गत 200 MB डेटा आणि कॉलसाठी 2.5 पैसे प्रति सेकंद दराने शुल्क आकारले जात होते.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, कंपनी 28 दिवसांसाठी 155 रुपयांपेक्षा कमी सर्व कॉलिंग आणि एसएमएस टॅरिफ काढून टाकण्याचा विचार करत आहे. असे झाल्यास, सिम सक्रिय ठेवण्यासाठी वापरकर्त्याला किमान 155 रुपयांचे रिचार्ज करावे लागेल. दरम्यान, भारती एअरटेलचा 2022-23 च्या डिसेंबर तिमाहीत मोबाईल सरासरी प्रति वापरकर्ता महसूल (ARPU) वाढून 193 रुपये झाला आहे, जो डिसेंबर 2021 च्या तिमाहीत 163 रुपये होता. एअरटेल ही देशातील दुसरी सर्वात मोठी दूरसंचार कंपनी आहे. त्याचे देशात 367 दशलक्ष वापरकर्ते आहेत. या प्रकरणात, जिओ 421 दशलक्ष वापरकर्त्यांसह शीर्षस्थानी आहे. तर व्होडाफोन-आयडीया 241 दशलक्ष वापरकर्त्यांसह तिसऱ्या क्रमांकावर आणि बीएसएनएल 106 दशलक्ष वापरकर्त्यांसह चौथ्या क्रमांकावर आहे.

(The above story first appeared on LatestLY on Feb 28, 2023 09:46 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).