World Test Championship Points Table: टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलिया मालिकेपूर्वी पॉइंट टेबलची स्थिती घ्या जाणून, भारतासाठी ही मालिका आहे खुप महत्त्वाची
Team India (Photo Credit - Twitter)

टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) यांच्यात होणाऱ्या कसोटी मालिकेची (Test Series) क्रिकेट चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलिया सध्या आयसीसी कसोटी टीम रँकिंगमध्ये (ICC Test Ranking) पहिल्या आणि दुसऱ्या क्रमांकावर आहेत. दोन्ही संघांमधील मालिकेतील पहिला सामना 9 फेब्रुवारी ते 13 फेब्रुवारी दरम्यान नागपुरात होणार आहे. टीम इंडियासाठी ही कसोटी मालिका खूप महत्त्वाची मानली जात आहे. ऑस्ट्रेलियन संघ भारतात आला असून त्याची तयारीही सुरू झाली आहे. टीम इंडियानेही नागपूरमध्ये सराव सत्राला सुरुवात केली आहे. (हे देखील वाचा: IND vs AUS Test Series: ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटीत 'या' भारतीय गोलंदाजांनी घेतले आहे सर्वाधिक बळी; पहा संपूर्ण यादी)

इंडिया आणि ऑस्ट्रेलियाचे संघ जेव्हा-जेव्हा आमनेसामने येतात तेव्हा ही स्पर्धा खूपच रोमांचक असते, मात्र यावेळी अधिकच उत्सुकता असेल. याचे सर्वात मोठे कारण म्हणजे आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2023. म्हणजेच कसोटी विश्वचषक. डब्ल्यूटीसीच्या अंतिम फेरीत पोहोचण्यासाठी टीम इंडियाला कोणत्याही परिस्थितीत ऑस्ट्रेलियाला हरवावे लागणार आहे.

पॉइंट्स टेबलवर एक नजर

डब्ल्यूटीसीच्‍या पॉइंट टेबलवर ऑस्‍ट्रेलियाचा संघ पहिल्या क्रमांकावर आहे आणि टीम इंडिया दुसऱ्या क्रमांकावर आहे. ऑस्ट्रेलियाने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये आतापर्यंत एकूण 15 सामने खेळले आहेत, त्यापैकी दहा जिंकले आहेत. या संघाला एका सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला असून उर्वरित सामने अनिर्णित राहिले आहेत. संघाचे 136 गुण आहेत आणि विजयाची टक्केवारी 75.56 आहे. म्हणजे ऑस्ट्रेलियाला डब्ल्यूटीसीच्या अंतिम फेरीत जाण्याची आशा आहे.

त्याचवेळी टीम इंडिया दुसऱ्या स्थानावरही मागे नाही. डब्ल्यूटीसीच्‍या दुसऱ्या आवृत्तीत टीम इंडियाने 14 सामने खेळले आहेत, ज्यापैकी टीम इंडियाने 8 सामने जिंकले आहेत. टीम इंडियाने चार सामने गमावले असून दोन सामने अनिर्णित राहिले आहेत. टीम इंडियाचे गुण 99 आहेत आणि विजयाची टक्केवारी 58.93 आहे. या यादीत श्रीलंकेचा संघ तिसऱ्या क्रमांकावर असून, तोही फायनलमध्ये जाण्याचा दावेदार मानला जात आहे. श्रीलंकेने आतापर्यंत खेळलेल्या 10 कसोटींपैकी पाच जिंकले आहेत आणि चार गमावले आहेत. एक सामना अनिर्णीत संपला. श्रीलंकेचे 64 गुण आहेत, तर विजयाची टक्केवारी 53.33 आहे.

अशा परिस्थितीत टीम इंडियाला कोणत्याही परिस्थितीत मालिका जिंकावीच लागेल. आकडेवारीवर नजर टाकली तर टीम इंडियाला चारपैकी किमान तीन सामने जिंकावे लागतील आणि एक कसोटी अनिर्णित राहिली तरी चालेल. आयसीसीच्या नियमांनुसार, जे संघ विजयाच्या टक्केवारीच्या आधारे क्रमांक एक आणि दोन असतील, ते दोन्ही संघ अंतिम फेरीतील आपले स्थान निश्चित करतील.

संघ मालिका सामना विजय पराभव ड्रॉ/टाई पॉइंट्स गुणांची टक्केवारी
ऑस्ट्रेलिया 5 15 10 1 4 136 75.56%
भारत 5 14 8 4 2 99 58.93%
श्रीलंका 5 10 5 4 1 64 53.33 %
दक्षिणआफ्रिका 5 13 6 6 1 76 48.72%
इंग्लड 6 22 10 8 4 124 46.97%
वेस्टइंडीज 5 11 4 5 2 54 40.90%
पाकिस्तान (E) 6 14 4 6 4 64 38.09%
न्यूझीलंड (E) 5 11 2 6 3 36 27.27%
बांग्लादेश (E) 6 12 1 10 1 16 11.11%