Rohit Sharma (Photo Credit - X)

Indian National Cricket Team vs Bangladesh National Cricket Team, Test Series 2024: श्रीलंका दौऱ्यानंतर भारतीय राष्ट्रीय क्रिकेट संघ (Indian National Cricket Team) आता विश्रांतीवर आहे. टीम इंडियाला आता सप्टेंबरमध्ये बांगलादेश राष्ट्रीय क्रिकेट संघाविरुद्ध (Bangladesh National Cricket Team) पुढील मालिका खेळायची आहे. दोन्ही संघांमध्ये कसोटी आणि टी-20 सामने खेळवले जाणार आहेत. चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर 19 सप्टेंबरपासून लाल चेंडूंच्या दोन सामन्यांच्या मालिकेला सुरुवात होणार आहे. यानंतर न्यूझीलंड राष्ट्रीय क्रिकेट संघ (New Zealand National Cricket Team) आणि ऑस्ट्रेलिया राष्ट्रीय क्रिकेट (Australia National Cricket Team) संघासोबतही स्पर्धा होणार आहे.

पहिला सामना 19 सप्टेंबरपासून

टीम इंडिया आणि बांगलादेश यांच्यातील दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना 19 सप्टेंबरपासून चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. दोन्ही संघांमधील हा कसोटी सामना सकाळी साडेनऊ वाजल्यापासून खेळवला जाणार आहे. यानंतर दुसरा कसोटी सामना 27 सप्टेंबर ते 1 ऑक्टोबर या कालावधीत कानपूरच्या ग्रीन पार्क स्टेडियमवर खेळवला जाईल. (हे देखील वाचा: Rohit Sharma on Shikhar Dhawan Retirement: "...द अल्टीमेट जाट" रोहित शर्माची शिखर धवनच्या निवृत्तीवर भावुक पोस्ट)

रोहित शर्माच्या कामगिरीवर सर्वांच्या नजरा

आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2023-25 ​​च्या पॉइंट टेबलमध्ये टीम इंडिया अजूनही पहिल्या स्थानावर आहे. अंतिम फेरीच्या शर्यतीत कायम राहण्यासाठी टीम इंडिया या मालिकेत पूर्ण गुण मिळवण्याचा पूर्ण प्रयत्न करेल. त्याचवेळी टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माच्या कामगिरीवर सर्वांच्या नजरा असतील, कारण पुढील 4-5 महिन्यांत एकूण 10 कसोटी सामने खेळवले जाणार आहेत. अशा परिस्थितीत कर्णधार रोहित शर्माचे फॉर्ममध्ये असणे टीम इंडियासाठी खूप महत्त्वाचे आहे.

दोन शतके झळकावून करणार 'भीमपराक्रम'

टीम इंडियाचा सलामीवीर फलंदाज रोहित शर्माने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आतापर्यंत एकूण 48 शतके ठोकली आहेत. रोहित शर्माने बांगलादेशविरुद्धच्या मालिकेत दोन शतके ठोकल्यास तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील 50 शतके पूर्ण करेल. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 50 किंवा त्याहून अधिक शतके करणारा रोहित शर्मा टीम इंडियाचा तिसरा फलंदाज ठरणार आहे. माजी दिग्गज फलंदाज सचिन तेंडुलकरने टीम इंडियासाठी सर्वाधिक शतके झळकावली आहेत. सचिन तेंडुलकरच्या नावावर 100 शतके आहेत. सचिन तेंडुलकरनंतर स्टार फलंदाज विराट कोहलीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 80 शतके ठोकली आहेत.

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतके ठोकणारे भारतीय फलंदाज:

सचिन तेंडुलकर - 100 शतके

विराट कोहली- 80 शतके

रोहित शर्मा - 48 शतके

राहुल द्रविड - 48 शतके

सर्वाधिक धावा करणारा रोहित शर्मा चौथ्या क्रमांकावर

टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने आतापर्यंत 59 कसोटी सामन्यांमध्ये 4137 धावा केल्या आहेत. याशिवाय त्याने 265 एकदिवसीय सामन्यांमध्ये 10866 धावा आणि 159 टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये 4231 धावा केल्या आहेत. टीम इंडियासाठी सर्वाधिक धावा करणारा रोहित शर्मा चौथ्या क्रमांकावर आहे. रोहित शर्मापेक्षा सचिन तेंडुलकर, विराट कोहली आणि राहुल द्रविड यांनी टीम इंडियासाठी जास्त धावा केल्या आहेत.