Jammu and Kashmir Beat Mumbai: रोहित शर्माच्या पुनरागमन सामन्यात मुंबईचा दारुण पराभव, जम्मू-काश्मीरचा पाच विकेट राखुन विजय
जम्मू-काश्मीरने मुंबईचा पाच विकेट्सने पराभव केला. शार्दुल ठाकूरच्या शतकाच्या जोरावर संघाने दुसऱ्या डावात 290 धावा केल्या आणि जम्मू-काश्मीरसमोर 205 धावांचे लक्ष्य ठेवले. जम्मू-काश्मीर संघाने पाच विकेट्स राखून लक्ष्य गाठले.
Ranji Trophy Elite 2024-25: रोहित शर्माचे (Rohit Sharma) पुनरागमन आणि स्टार खेळाडूंनी भरलेल्या मुंबई संघाला रणजी ट्रॉफीमध्ये जम्मू आणि काश्मीरकडून पराभव (Jammu and Kashmir Beat Mumbai) स्वीकारावा लागला. जम्मू-काश्मीरने मुंबईचा पाच विकेट्सने पराभव केला. शार्दुल ठाकूरच्या शतकाच्या जोरावर संघाने दुसऱ्या डावात 290 धावा केल्या आणि जम्मू-काश्मीरसमोर 205 धावांचे लक्ष्य ठेवले. जम्मू-काश्मीर संघाने पाच विकेट्स राखून लक्ष्य गाठले. जम्मू आणि काश्मीर संघाने दुसऱ्यांदा मुंबईला त्यांच्या घरच्या मैदानावर पराभूत केले आहे. सामन्यात सात विकेट घेणाऱ्या युद्धवीर सिंगला सामनावीराचा किताब देण्यात आला.
जम्मू आणि काश्मीरने सहज लक्ष्य गाठले
205 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना जम्मू आणि काश्मीरने शुभमन खजुरिया (41) आणि यावर हसन (24) यांच्या सलामीच्या खेळीमुळे चांगली सुरुवात केली. विव्रांत शर्मा 38 धावा काढून बाद झाला आणि अब्दुल समद 24 धावा काढून बाद झाला. पारस डोग्राने 15 धावांचे योगदान दिले. शम्स मुलानीने जम्मू आणि काश्मीर संघाला तीन झटके देऊन सामन्यात उत्साह आणला. पण यानंतर आबिद मुश्ताक आणि कन्हैया वाधवान यांच्या जोडीने संघाला विजय मिळवून दिला. आबिद मुश्ताक 32 धावांवर नाबाद राहिला आणि कन्हैया वाधवान 19 धावांवर नाबाद राहिला.
रोहित शर्मा दोन्ही डावात ठरला अपयशी
रणजी ट्रॉफीमध्ये मुंबईसाठी रोहित शर्मा दोन्ही डावात अपयशी ठरला. दहा वर्षांनंतर पुनरागमन करणाऱ्या रोहित शर्माला पहिल्या डावात फक्त तीन धावा करता आल्या, तर दुसऱ्या डावातही त्याने फक्त 28 धावा केल्या. (हे देखील वाचा: Ranji Trophy 2025: 25 चौकार आणि 3 षटकारांसह, कर्नाटकच्या तरुण खेळाडूची आक्रमक खेळी, पंजाबविरुद्ध रणजीमध्ये झळकावले द्विशतक)
जैस्वाल रहाणे आणि अय्यर यांची बॅट शांत
रोहित व्यतिरिक्त, यशस्वी जैस्वाल, अजिंक्य रहाणे आणि श्रेयस अय्यर यांची बॅटही या सामन्यात शांत राहिली. यशस्वी जैस्वालने पहिल्या डावात चार आणि दुसऱ्या डावात 26 धावा केल्या. दरम्यान, रहाणे (पहिल्या डावात - 12 धावा, दुसऱ्या डावात - 16 धावा) आणि श्रेयस अय्यर (पहिल्या डावात - 11 धावा, दुसऱ्या डावात - 17 धावा) यांनीही निराशा केली. याशिवाय शिवम दुबे दोन्ही डावात खाते उघडू शकला नाही.
मुंबईने पहिल्या डावात केल्या 120 धावा
मुंबई संघाने पहिल्या डावात 120 धावा केल्या होत्या, ज्याला प्रत्युत्तर म्हणून जम्मू आणि काश्मीर संघाने 206 धावा केल्या. शुभम खजुरियाने 53 धावा आणि आबिद मुश्ताकने 44 धावा केल्या. पहिल्या डावात जम्मू आणि काश्मीरला 86 धावांची आघाडी मिळाली. दुसऱ्या डावात मुंबई संघाला फक्त 290 धावा करता आल्या. शार्दुल ठाकूरने शतकी खेळी केली आणि 119 धावा करून बाद झाला. जम्मू-काश्मीरने पाच विकेट्स गमावून लक्ष्य गाठले.