IND vs NZ 2nd Test: एजाज पटेलने 14 विकेट घेत मोडला Ian Botham चा विक्रम, टीम इंडियाविरुद्ध पहिल्यांदाच असे घडले
एजाज पटेल (Photo Credit: PTI)

न्यूझीलंडचा (New Zealand) डावखुरा फिरकीपटू एजाज पटेलने (Ajaj Patel) रविवारी आपल्या कसोटी कारकिर्दीत शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा जोडला आणि मुंबईतील (Mumbai) भारताविरुद्ध तिसऱ्या आणि शेवटच्या कसोटीत सामन्यातील सर्वोत्तम आकडेवारी नोंदवली. मुंबईत जन्मलेल्या एजाज पटेलने भारताच्या (India) दुसऱ्या डावात 106 धावांवर 4 गडी बाद करत सामन्यात 14 विकेट घेतल्या. यापूर्वी 1980 मध्ये याच मैदानावर इंग्लंडचे माजी अष्टपैलू खेळाडू इयान बॉथम (Ian Botham) यांनी 106 धावांवर 13 विकेट घेतल्या होत्या आणि भारताविरुद्ध त्यावेळी कसोटी सामन्यातील 225 धावांवर 14 विकेट ही सर्वोत्तम गोलंदाजी केली होती. उल्लेखनीय आहे की वानखेडे स्टेडियमवर (Wankhede Stadium) 14 विकेट घेणारा पटेल हा पहिला गोलंदाज आहे. भारताने आपला दुसरा डाव 7 बाद 276 धावांवर घोषित करून मुंबईतील मालिकेच्या अंतिम सामन्यात न्यूझीलंडसमोर 540 धावांचे लक्ष्य ठेवले. (IND vs NZ 2nd Test Day 3: एजाज पटेलचा भेदक मारा, भारताचा दुसरा डाव 276/7 धावसंख्येवर घोषित; न्यूझीलंडसमोर 540 धावांचे विशाल टार्गेट)

भारतात कसोटी सामन्याच्या एका सामन्यात सर्वाधिक विकेट्स घेणारा एजाज हा जगातील पहिला विदेशी गोलंदाज ठरला आहे.  दरम्यान 33 वर्षीय हा शनिवारी कसोटी क्रिकेटमध्ये दुसऱ्या दिवशी एका डावात सर्व 10 विकेट घेणारा तिसरा गोलंदाज ठरला. त्याने इंग्लंडचा ऑफस्पिनर जिम लेकर (ऑस्ट्रेलियाविरुद्ध 1956) आणि भारताचा लेगस्पिनर अनिल कुंबळे यांच्या पराक्रमाची बरोबरी केली. भारताचे दिग्गज फिरकीपटू कुंबळे यांनी पाकिस्तानच्या 1998 भारत दौऱ्यावेळी दिल्लीच्या फिरोज शाह कोटला स्टेडियमवर झालेल्या कसोटी सामन्यात हा कारनामा केला होता. दुसरीकडे, भारताने पहिल्या डावात 325 धावा केल्या होत्या. तर प्रत्युत्तरात न्यूझीलंडचा डाव खराब फलंदाजीमुळे 62 धावांवर आटोपला.

भारताच्या दुसऱ्या डावाबद्दल बोलायचे तर टीम इंडियाकडून सलामीवीर मयंक अग्रवालने सर्वाधिक 62 धावा केल्या. तर चेतेश्वर पुजारा आणि शुभमन गिलने प्रत्येकी 47 धावा, अक्षर पटेलने नाबाद 41 आणि कर्णधार विराट कोहलीने 36 धावांचे उपयुक्त योगदान दिले. न्यूझीलंडकडून पहिल्या डावात सर्व 10 बळी घेणारा फिरकीपटू एजाज पटेलने 106 धावा देऊन चार, तर रचिन रवींद्रने 56 धावा देऊन तीन विकेट घेतल्या. लक्षात घ्यायचे की भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील कानपुरच्या ग्रीन पार्क येथे झालेला पहिला कसोटी सामना अनिर्णित राहिला होता.