शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे. सोमवारी रात्री, शिवसेना शिंदे गटाच्या महिला कार्यकर्त्यांनी ठाकरे गटाच्या रोशनी शिंदे यांना बेदम मारहाण केली. आज उद्धव ठाकरे यांनी रोशनी शिंदे यांची भेट घेतल्यानंतर पत्रकार परिषद घेऊन आपला संताप व्यक्त केला. यावेळी ठाकरे यांनी राज्याला फडतूस गृहमंत्री मिळाला असल्याचे म्हटले. यासह ठाण्यातील नव्हे तर राज्यातील गुंडगिरी मुळासह उखडून टाकू असेही ते म्हणाले.

या टीकेनंतर आता देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. ते म्हणाले, ‘अडीच वर्षांचा उद्धव ठाकरेंचा कारभार पाहिल्यानंतर नेमक फडतूस कोण आहे हे संपूर्ण महाराष्ट्राला माहित आहे. दोन-दोन मंत्री जेलमध्ये गेल्यानंतरही जे मुख्यमंत्री त्यांचा राजीनामा घेत नाहीत, त्यांना बोलायचा अधिकार नाही. जे वाझेच्या मागे लाळ घोटतात त्यांना बोलण्याचा काय अधिकार आहे. ज्यांच्या काळात पोलीस खंडणी वसूल करतात त्यांना बोलण्याचा काय अधिकार आहे. अडीच वर्षे घरी बसून काम करणाऱ्या व्यक्तीने आम्हाला राजकारण शिकवू नये. आमचे तोंड उघडले तर त्यांना पळता भुई थोडी होईल.’

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)