Buldhana Rain: ऐन थंडीत अवकाळी पाऊस, बुलढाणा जिल्ह्यातील  शेतकऱ्यांसमोर आव्हान; रब्बी पिकांना फटका बसण्याची चिन्हे
Heavy Rains | (Image used for representational purpose only) (Photo Credits: Pixabay)

राज्यभरात सुरु असलेला थंडीचा कडाका काहीसा कमी होणार असे भाकीत झाले असले तरी अवकाळी पावसाने शेतकऱ्यांसोमर आव्हान उभे केले आहे. खास करुन बुलढाणा (Buldhana) जिल्ह्यात अवकाळी पावसाचे आगमन झाले आहे. त्यामुळे रब्बी (Rabi Crop) पिकांना फटक बसण्याची शक्यात व्यक्त केली जात आहे. रब्बी हंगामामुळे बुलढाण्यात कांदा लागवडीच्या कामांनी जोर पकडला आहे. त्यातच वातावरण ढगाळ झाले आहे. काही ठिकाणी पावसाच्या सरी बरसल्या आहेत. अनेक ठिकाणी धुक्यांची चादर पाहायला मिळत आहे. परिणामी पिकांना फटका बसण्याची चिन्हे आहेत.

बुलढाणा जिल्ह्यात काल रात्री (25 जानेवारी) अनेक ठिकाणी अवकाळी पावसाने तडाखा दिला आहे. त्यामुळे शेतकरी हवालदील झाला आहे. बुलढाणा जिल्ह्यात पावसाने हजेरी लावलेली ठिकाणे खालीलप्रमाणे:

  • बुलढाणा
  • चिखली
  • देऊळगाव राजा
  • संग्रामपूर
  • जळगाव जामोद
  • मेहकर

दरम्यान, अवकाळी पावसामुळे कांदा, हरभरा, मका, गहू आदी पिकांवर जोरदार परिणाम होण्याची शक्यता आहे. दाट धुके आणि अवकाळी पावसामुळे गव्हावर तांबेरा नावाचा रोग पडतो. तर हरभरा पिकावर घाट आळी येण्याची शक्यता असते. कांदा आणि मका पिकावर करपा रोगाचा प्रादुर्भाव जाणवतो.

पाठिमागील काही दिवसांपासून थंडीचा कडाका जसजसा जाणवतो आहे तसतसा वायूप्रदुषणाचा मुद्दाही पुढे येताना दिसतो आहे. अनेक ठिकाणी धुक्यांमुळे नागरिकांना श्वसनविकार पाहायला मिळत आहेत. सर्दी, खोकला, डोकेदुखी असेही त्रास जाणवताना दिसतात. राजधानी मुंबई शहरातील हवेची गुणवत्ता मोठ्या प्रमाणावर कमी झाली आहे. हवा गुणवत्ता निर्देशांकात मोठी घट झाल्याचे पाहायला मिळते आहे. परिणामी आगामी काळात नागरिकांना विविध आजारांना तोंड द्यावे लागू शकते अशी भीती तज्ज्ञ वर्तवतात.