Teachers Recruitment 2021: महाराष्ट्रात 2062 शिक्षक भरती साठी 3902 उमेदवारांच्या मुलाखतींची शिफारस; वर्षा गायकवाड यांची घोषणा

जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील सुमारे 27 हजार, आणि माध्यमिक शाळेतील 13 हजार अशी एकूण 40 हजार शिक्षकांच्या जागा रिकाम्या आहेत. शिक्षण विभाग टप्प्याटप्प्याने या जागा भरतील.

Teachers Recruitment 2021: महाराष्ट्रात 2062 शिक्षक भरती साठी 3902 उमेदवारांच्या मुलाखतींची शिफारस; वर्षा गायकवाड यांची  घोषणा
Varsha Gaikwad | (Photo Credits: Facebook)

येत्या शिक्षक दिनापूर्वीच यंदा राज्यातील शिक्षकांना शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad) यांनी मोठी आनंदाची बातमी दिली आहे. काल शिक्षणमंत्र्यांनी ट्वीट करत दिलेल्या माहितीनुसार, राज्यात शिक्षकपद भरती सुरू झाली आहे. पहिल्या टप्प्यांत 2062 जागा भरण्यात येणार आहेत. यामध्ये 3902 उमेदवारांच्या मुलाखतीसाठी शिफारस करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे. ही शिक्षक भरती राज्य सरकारच्या पवित्र पोर्ट च्या माध्यमातून केली जाणार आहे. त्यांनी केलेल्या ट्वीट मध्ये “पवित्र पोर्टलच्या माध्यमातून 561 खाजगी व्यवस्थापनाच्या 2062 रिक्त पदांसाठी 15123 पसंतीक्रमावर 3902 उमेदवारांची मुलाखतीसाठी शिफारस करण्यात येत आहे. उमेदवारांना मुलाखतीसाठी हार्दिक शुभेच्छा!” असे सांगण्यात आले आहे.

वर्षा गायकवाड ट्वीट

महाराष्ट्रामध्ये 6100 शिक्षण सेवकांची पदं भरली जाणार आहेत. राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या, खाजगी व्यवस्थापनाच्या अनुदानित, अंशतः अनुदानित व विना अनुदानित तसेच अनुदानास पात्र घोषित केलेल्या प्राथमिक, उच्च प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळांमधील तसेच शासकीय व अनुदानित अध्यापक पदविका विद्यालयातील (डीएलएड कॉलेज) शिक्षकांच्या रिक्त जागांवर नोकरभरती होणार आहे. दरम्यान सार्‍यांना निवडीची समान संधी मिळावी आणि शिक्षण सेवक पदासाठी उच्च गुणवत्ताधारक उमेदवारांची निवड करण्यासाठी शिक्षण सेवकांची भरती अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी परीक्षा घेण्यात आली होती. त्यामध्ये मिळालेल्या गुणांच्या माध्यमातून उमेदवारांची मुलाखत घेऊन अंतिम निवड करण्यात येईल अशी माहिती आहे.(नक्की वाचा: Maharashtra School Reopening: कोविड-19 संकटाच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक शाळेत Health Clinic उभारणार).

जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील सुमारे 27 हजार, आणि माध्यमिक शाळेतील 13 हजार अशी एकूण 40 हजार शिक्षकांच्या जागा रिकाम्या आहेत. शिक्षण विभाग टप्प्याटप्प्याने या जागा भरतील. पहिल्या टप्प्यात 6100 जागा भरण्यात येणार आहेत.

आदिवासी समाजा मधील डी.एड, बीएड धारक विद्यार्थ्यांनी शिक्षक भरतीसाठी 23 ऑगस्टला पालघर जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण झाले होते. पालघर जिल्ह्यातील अनुसूचित जमाती पेसा क्षेत्रातील शिक्षकांच्या 1662 रिक्त जागा सरळसेवा शिक्षक भरती प्रक्रिया राबवण्यासाठी हे आंदोलन करण्यात आले होते.

(The above story first appeared on LatestLY on Sep 03, 2021 01:04 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).