Uddhav Thackeray and Narendra Modi | (Photo credit: archived, edited, representative image)

'काँग्रेसमुक्त भारत', 'हिंदुराष्ट्र', 'हिंदुत्व' अशा एक ना अनेक वलग्ना करुन सन 2014 पासून निवडणूक आणि त्यानंतरच्या काळातही रान पेटवून देणाऱ्या भाजप (BJP) आणि नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांना सार्वत्रिक निवडणूक 2024 मध्ये जोरदार धक्का बसला. त्यामुळे नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजप केंद्रात सत्तेत राहिला असला तरी त्यांच्याकडे बहुमताचा आकडा राहिला नाही. परिणामी त्यांना एनडीएतील घटक पक्ष आणि चंद्राबाबू नायडू, नीतीश कुमार यांसारख्या मित्रांच्या कुबड्यांवर अवलंबून राहावे लागणार आहे. यावरुन शिवसेना (UBT) पक्षाचे मुखपत्र दै. सामना संपादकीयातून (Daily Saamna Editorial) भाजप आणि नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार टीकास्त्र सोडण्यात आले आहे. नरेंद्र मोदी यांचा तोरा उतरला, त्यांच्या 56 इंचाच्या फुगलेला छातीला मतदारांनीच टाचणी लावली. त्यामुळे त्यांचा तोरा उतरला असल्याचे सेनेने म्हटले आहे. काय म्हटले आहे सामना संपादकीयात? घ्या जाणून

नऊ राज्यांतून भाजप हद्दपार

भारतीय जनता पार्टीला जनतेने नाकारले असून नऊ राज्यांतून तो हद्दपार झाला असल्याचे सांगताना सामना संपादकियामध्ये म्हटले आहे की, ''नरेंद्र मोदी 2014 साली प्रथम सत्तेवर आले तेव्हा ‘काँग्रेसमुक्त भारता’चा नारा त्यांनी दिला. 2024 साली त्याच काँग्रेसने मोदींच्या गर्वाने फुगलेल्या छातीचा फुगा फोडला आहे. काँग्रेसने मुसंडी मारून भाजपच्या बहुमताचे मुंडके उडवले. किमान नऊ राज्यांतून भाजप हद्दपार झाला. भाजपला तेथे खाते उघडता आले नाही. तामीळनाडूसारख्या मोठय़ा राज्यात भाजपला एकही जागा मिळाली नाही. पंजाब हे महत्त्वाचे राज्य आहे. या राज्यातही भाजप खाते उघडू शकला नाही. मेघालय, मणिपूर, नागालॅण्ड, सिक्कीम अशा सीमावर्ती राज्यांत भाजपची कामगिरी शून्य आहे. पुद्दुचेरी, चंदिगढमध्येही भाजप उरलेला नाही''. (हेही वाचा, Shiv Sena (UBT) Supports Rahul Gandhi: नरेंद्र मोदी ब्रँड संपला! राहुल गांधी यांना पंतप्रधान पदासाठी शिवसेना (UBT) पक्षाचा पाठिंबा: संजय राऊत)

भाजपवर मुंडण करून स्वतःचे श्राद्ध घालण्याची वेळ

उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्रावर भाजपची सर्वाधिक भिस्त होती. मात्र, या दोन्ही राज्यांनी भाजपला अपेक्षीत साथ दिली नाही. त्यावरुन टोला लगावताना सामनामध्ये म्हटले आहे की, ''उत्तर प्रदेशसारख्या राज्यात काँग्रेस व समाजवादी पार्टीने मिळून भाजपला ‘अर्ध्या’ राज्यातून साफ केले. महाराष्ट्रातील भाजपवर तर मुंडण करून स्वतःचे श्राद्ध घालण्याची वेळ शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसने आणली. देशातील हे गणित पाहिले तर ‘काँग्रेसमुक्त भारत’ या नारेबाजीची साफ शकले उडाली आहेत. (हेही वाचा, Uddhav Thackeray vs Eknath Shinde: एकनाथ शिंदे यांना मोठा धक्का! शिंदे गटातील 5-6 आमदार उद्धव ठाकरेंच्या संपर्कात )

भाजपचे ‘पिंड’ कावळय़ासह उडवून लावले

मोदी व शहांनी जे जे अनैसर्गिक कृत्य केले ते त्यांच्यावर उलटले. गेल्या काही दिवसांपासून मोदी-शहा हे उसने अवसान आणून दंडबैठका ठोकीत आहेत, पण त्यांच्या काळवंडलेल्या चेहऱ्यावर पराभव स्पष्ट दिसतोय. मोदी हे काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, तृणमूल काँग्रेसला संपवायला निघाले होते, पण मोदींना ते जमले नाही व हे पक्ष अधिक मजबुतीने उभारी घेऊन पुढे आले. शरद पवार हे भटकती आत्मा व उद्धव ठाकरे नकली संतान असल्याची भाषा मोदी यांनी प्रचारात वापरली, पण त्याच भटकत्या आत्म्याने व नकली संतानाने महाराष्ट्रातून भाजपचे ‘पिंड’ कावळय़ासह उडवून लावले व बहुमत गमावलेला मोदींचा आत्मा प्रादेशिक पक्षांच्या पिंपळावर लटकलेला दिसत आहे, अशा शब्दांमध्ये सामना संपादकियांतून भाजपची खिल्ली उडवली गेली आहे.

दरम्यान, सत्ता स्थापनेसाठी बहुमताचा आकडा गाठताना मोदी-शहा यांची दमछाक झाली. मोदी यांचा तोरा उतरला. मोदी यापुढे हिंदुत्वाचा ‘हि’सुद्धा तोंडातून काढू शकणार नाहीत. मोदी यांनी जे ठरवले तसे काहीच झाले नाही. कारण मोदी यांचे बोलणे व डोलणे सर्वच खोटे होते. त्यांचे तप, ध्यान हे ढोंग होते. सत्तेसाठी मोदी यांनी आधी पक्षफोडी केली, आता तडजोडी केल्या. कारण ‘काँगेसमुक्त भारत’ करण्याच्या फंदात अर्धा भारत ‘भाजपमुक्त’ झाला व मोदींचा तोरा कुबडय़ांवर लटकला आहे. ‘इंडिया’ने ‘बहुमतमुक्त भाजप’ हे सत्य कृतीत आणले. तरीही मोदी यांना म्हणे जगभरातून अभिनंदनाचे संदेश येत आहेत असा दावा त्यांचे लोक करतात. हे आश्चर्यच आहे!, अशा शब्दांमध्ये शिवसेना (UBT) पक्षाने भाजपचा समाचार घेतला आहे.