School Holiday Tomorrow 28 August: रक्षाबंधन दिवशी शाळा, कॉलेजला सुट्टी; शासकीय कार्यालयंही बंद राहणार?
रक्षाबंधनच्या निमित्ताने मुंबई शहर आणि मुंबई उपनगरातील शाळा, महाविद्यालये आणि शासकीय कार्यालयांना 20 ऑगस्टला सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
भारतात श्रावण पौर्णिमेचा दिवस हा रक्षाबंधन सणाचा दिवस आहे. उद्या शुक्रवार 28 ऑगस्ट 2026 रोजी देशभर रक्षाबंधनाचा सण साजरा होणार आहे. या निमित्ताने मुंबईत शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी असून, शासकीय कार्यालयेही या दिवशी बंद राहणार आहेत. भाऊ-बहिणीच्या प्रेमाचे प्रतीक असलेला हा सण भारतात सर्वत्र मोठ्या उत्साहात साजरा केला जाणार आहे. महाराष्ट्र सरकारने यंदा मुंबई शहर आणि मुंबई उपनगर जिल्ह्यातील राज्य व निमशासकीय कार्यालयांसाठी सुट्टीच्या वेळापत्रकात बदल केला आहे. यंदा दहीहंडीनिमित्तची सुट्टी रद्द करून 28 ऑगस्ट 2026 रोजी रक्षाबंधनाची शासकीय सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. हा निर्णय मुंबई शहर आणि मुंबई उपनगरातील संबंधित शासकीय व निमशासकीय कार्यालयांना लागू असेल.
शाळा-महाविद्यालयांना सुट्टी
महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण विभागाच्या सुट्ट्यांच्या यादीत रक्षाबंधन आणि नारळी पौर्णिमा या सणाचा समावेश असतो. त्यामुळे राज्यातील शासकीय, निमशासकीय तसेच अनुदानित शाळा आणि महाविद्यालयांना उद्या सुट्टी असणार आहे. विद्यार्थ्यांना घरी राहून कुटुंबासोबत हा सण साजरा करता यावा, यासाठी ही सुट्टी दिली जाते. दरम्यान सरकार कडून मुंबई शहर आणि मुंबई उपनगरात केवळ शाळांची सुट्टी जाहीर करण्यात आलेली आहे. काही खासगी शाळा आणि महाविद्यालयांचे सुट्ट्यांचे वेळापत्रक स्वतंत्र असू शकते, त्यामुळे पालकांनी आपल्या पाल्याच्या शाळेकडून सुट्टीबाबत खात्री करून घेणे उपयुक्त ठरेल.
शासकीय कार्यालयांची स्थिती
राज्य शासनाच्या सार्वजनिक सुट्ट्यांच्या यादीत रक्षाबंधन समावेश असल्याने, मुंबईत मंत्रालयासह जिल्हा प्रशासन, महापालिका, नगरपालिका आणि अन्य शासकीय कार्यालये उद्या बंद राहणार आहेत. मात्र आपत्कालीन सेवा, रुग्णालये, पोलीस दल आणि अत्यावश्यक सेवा नेहमीप्रमाणे सुरू राहतील.
बँकांबाबत मात्र स्पष्टता आवश्यक आहे. रिझर्व्ह बँकेच्या सुट्ट्यांच्या यादीनुसार रक्षाबंधन हा राज्यनिहाय बदलणारा ऐच्छिक सुट्टीचा दिवस असल्याने, महाराष्ट्रातील बँका या दिवशी सुरू राहण्याची शक्यता अधिक आहे. नागरिकांनी बँकेच्या कामकाजाबाबत संबंधित शाखेकडून खातरजमा करून घ्यावी.
रक्षाबंधन सणाचे महत्त्व
रक्षाबंधन हा सण श्रावण महिन्याच्या पौर्णिमेला साजरा केला जातो. या दिवशी बहिणी भावांच्या हातावर राखी बांधून त्यांच्या दीर्घायुष्यासाठी आणि सुखी जीवनासाठी प्रार्थना करतात, तर भाऊ बहिणींचे रक्षण करण्याचे वचन देतात. हाच दिवस कोकण किनारपट्टीवर नारळी पौर्णिमा म्हणूनही साजरा होतो, जेव्हा कोळी बांधव समुद्राला नारळ अर्पण करून वरुण देवतेची पूजा करतात.
दरवर्षी राज्य शासन शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीलाच सार्वजनिक सुट्ट्यांची यादी जाहीर करते, ज्यामध्ये सण-उत्सवांच्या तारखांनुसार शाळा, महाविद्यालये आणि शासकीय कार्यालयांच्या सुट्ट्यांचा समावेश असतो. रक्षाबंधन हा सण दरवर्षी वेगळ्या तारखेला येत असल्याने, नागरिकांना अचूक तारीख आणि सुट्टीबाबत शासनाच्या अधिकृत सुट्ट्यांच्या यादीतून खात्री करून घेण्याचा सल्ला दिला जातो.