राज्यातील हॉटेल-लॉज लवकरच सुरु करण्याचा विचार; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील हॉटेल्स असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांसोबत केली चर्चा
CM Uddhav Thackeray (Photo Credits: Twitter)

मिशन बिगिन अगेन (Mission Begin Again) मध्ये राज्यात उद्योग व्यवसाय सुरु केले आहेत. महाराष्ट्रात पर्यटन व्यवसायांत हॉटेल उद्योगाचे मोठे स्थान लक्षात घेऊन हा उद्योग परत सुरू करण्यासाठी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कार्यपद्धती तयार केली आहे. ती अंतिम झाल्यावर हॉटेल्स आणि रेस्टॉरंट सुरु करण्याचा विचार असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी सांगितले आहे.

उद्धव ठाकरे यांनी आज राज्यातील हॉटेल्स असोसिएशन (Hotels Association) च्या पदाधिकाऱ्यांसोबत व्हिडीओ कॉन्फरन्समध्ये संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते. कोणत्याही हॉटेल व्यवस्थापनांनी आपल्या कामगार आणि कर्मचाऱ्यांना कामावरून काढू नये, असं आवाहनदेखील मुख्यमंत्र्यांनी यावेळी केलं आहे. (हेही वाचा - पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या पाठोपाठ कुटुंबीयांनाही कोरोना विषाणूची लागण; आतापर्यंत 8 जणांचे रिपोर्ट्स सकारात्मक)

दरम्यान, यावेळी मुख्यमंत्री म्हणाले की, हॉटेल उद्योग हा पर्यटन व्यवसायासाठी अतिशय महत्वाचा आहे. त्यामुळे राज्याच्या विकासाला उत्तेजना मिळते. मुंबई आणि पुण्यासारख्या भागात करोनाच्या केसेस वाढत आहेत. परंतु, एप्रिल महिन्याच्या शेवटापासून आपण ग्रीन आणि ऑरेंज क्षेत्रात अटी आणि शर्तींच्या अधीन राहून उद्योग व्यवसाय सुरु करण्यास परवानगी दिली आहे. त्याठिकाणी आज अनेक उद्योग सुरु झाले असून कामगारही रुजू झाले आहेत. त्यामुळे कामगारांना नोकरीवरून काढू नका. मी स्वत: यासंदर्भात काही व्यवस्थापनांशी बोलणार आहे. नव्या नोकऱ्या देतांना जुन्यांच्या नोकऱ्या घालवू नका, असं आवाहनही यावेळी मुख्यमंत्र्यांनी नागरिकांना केलं आहे.