Namdev Shastri and Dhananjay Munde (संग्रहित संपादित प्रतिमा)

पुणे जिल्ह्यातील देहू (Dehu) येथे शुक्रवारी होणारा वंजारी समाजाचे आध्यात्मिक नेते नामदेव शास्त्री (Namdev Shastri) यांचा 'कीर्तन' कार्यक्रम रद्द करण्यात आला आहे. मराठा संघटनांच्या विरोधामुळे आणि स्थानिक पोलिसांनी जारी केलेल्या इशाऱ्यानंतर हा कार्यक्रम रद्द केला गेला. भगवानगड संस्थानचे प्रमुख शास्त्री यांनी अलिकडेच राज्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री धनंजय मुंडे यांना पाठिंबा दिला आहे. वंजारी समाजाचे धनंजय मुंडे यांच्यावर सध्या बीड जिल्ह्यातील मराठा समाजातील सरपंचाच्या हत्येवरून टीका होत आहे. अशात शास्त्री यांनी मुंडेंना पाठींबा दिल्यानंतर त्यांचा देहू एथिक कार्यक्रम रद्द व्हावा अशी मागणी होत होती. बीड आणि अहिल्यानगर जिल्ह्यांच्या सीमेवर असलेले भगवानगड हे वंजारी समाजाचे धार्मिक केंद्र आहे.

बीड जिल्ह्यातील एका ऊर्जा कंपनीला लक्ष्य करून खंडणीचा प्रयत्न थांबवण्याचा प्रयत्न केल्याने 9 डिसेंबर 2024 रोजी मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण करण्यात आले, त्यांचा छळ करण्यात आला आणि त्यांची हत्या करण्यात आली. या हत्येप्रकरणी सात जणांना अटक करण्यात आली आहे. मुंडे यांचा निकटवर्तीय वाल्मिक कराड यालाही संबंधित खंडणी प्रकरणात अटक करण्यात आली आहे.

वंजारी समाजातील एक आदरणीय व्यक्ती असलेले शास्त्री यांनी अलिकडेच दावा केला होता की. मुंडे यांना मुद्दाम लक्ष्य केले जात आहे. नंतर त्यांनी मृत सरपंच देशमुख यांच्या कुटुंबाची भेट घेतल्यानंतर त्यांनाही पाठिंबा दिला. आता संत तुकाराम महाराजांचे मंदिर असलेल्या देहूजवळील श्री क्षेत्र भंडारा डोंगर येथे शुक्रवारी शास्त्रींचा कार्यक्रम होणार होता. अखंड मराठा समाजाच्या सदस्यांनी 1 फेब्रुवारी रोजी मंदिर विश्वस्तांना एक पत्र सादर केले, ज्यामध्ये शास्त्रींचे 'कीर्तन' रद्द करण्याची विनंती करण्यात आली होती. (हेही वाचा: Shiv Jayanti 2025: शिवजयंतीला शिवनेरी किल्ल्यावर जात असाल तर लक्ष द्या! प्रशासनाने जाहीर केले वाहतूक बदल, पहा मार्ग व पार्किंग व्यवस्था)

त्यानंतर आता तळेगाव दाभाडे पोलिसांनी मंगळवारी मंदिराच्या विश्वस्तांना एक पत्र जारी केले, ज्यामध्ये इशारा देण्यात आला आहे की जर 'कीर्तन' कार्यक्रम झाला तर कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो आणि मराठा संघटनेचे सदस्य शास्त्रींना लक्ष्य करण्याचा प्रयत्न करू शकतात. सध्याची परिस्थिती, मराठा संघटनांनी सादर केलेले पत्र आणि पोलिसांनी दिलेला इशारा लक्षात घेता, शुक्रवारी होणारे नामदेव शास्त्री यांचे कीर्तन स्थगित करण्याचा निर्णय घेतल्याचे, मंदिराचे विश्वस्त बाळासाहेब काशीद यांनी सांगितले. कार्यक्रम रद्द करण्याचा निर्णय घेण्यापूर्वी शास्त्रींशी चर्चा करण्यात आली, असेही त्यांनी सांगितले.