मुंबईकरांसाठी खुशखबर! 238 नव्या एसी लोकल धावणार; पहिली गाडी नियोजित वेळेपेक्षा 3 वर्षे आधीच येणार
मुंबईच्या उपनगरीय रेल्वे प्रवाशांसाठी लवकरच २३८ नव्या वातानुकूलित लोकल गाड्या उपलब्ध होणार आहेत. भारतीय रेल्वेने या गाड्यांच्या उत्पादनाला गती देण्याचा निर्णय घेतला असून, पहिली गाडी नियोजित वेळेपेक्षा तीन वर्षे आधी, म्हणजेच २०२७ मध्ये रुळांवर धावणार आहे.
मुंबईच्या उपनगरीय रेल्वे नेटवर्कसाठी मंजूर करण्यात आलेल्या २३८ नव्या वातानुकूलित (एसी) लोकल गाड्यांचे उत्पादन आता तीन रेल्वे उत्पादन युनिट्समध्ये एकाचवेळी सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे या प्रकल्पाला मोठी गती मिळणार असून, पहिली गाडी नियोजित वेळेपेक्षा तब्बल 3 वर्षे आधी, म्हणजेच २०२७ मध्ये सेवेत दाखल होणार आहे, तर संपूर्ण ताफा २०३० पर्यंत पूर्णपणे कार्यरत होईल. अशी माहिती राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी X वर पोस्ट करत दिली आहे.
उत्पादन प्रक्रियेत मोठा बदल
आधीच्या नियोजनानुसार, तंत्रज्ञान भागीदारांमार्फत या गाड्यांचे मालिका उत्पादन सुरू होण्यासाठीच दीर्घ खरेदी प्रक्रिया पार पाडावी लागणार होती. यामुळे पहिली गाडी सुमारे २०३० पर्यंत आणि संपूर्ण ताफा २०३४ पर्यंतच उपलब्ध होण्याची शक्यता होती. ही वेळखाऊ प्रक्रिया लक्षात घेता, आता सर्व २३८ गाड्यांचे उत्पादन एकाचवेळी तीन रेल्वे उत्पादन युनिट्समध्ये करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामध्ये चेन्नई येथील इंटिग्रल कोच फॅक्टरी (आयसीएफ), कपूरथला येथील रेल कोच फॅक्टरी (आरसीएफ) आणि रायबरेली येथील मॉडर्न कोच फॅक्टरी (एमसीएफ) यांचा समावेश आहे.
केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची प्रतिक्रिया
केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी या निर्णयाबाबत बोलताना, मुंबई लोकल ही शहराची जीवनवाहिनी असल्याचे नमूद केले. आधीची खरेदी प्रक्रिया अनेक अडचणींना सामोरी जात होती आणि संपूर्ण प्रक्रिया २०३० पर्यंत लांबण्याची शक्यता होती, जी स्वीकारार्ह नव्हती, असे त्यांनी सांगितले. त्यामुळेच उत्पादन आता भारत सरकारच्या तीन उत्पादन युनिट्समार्फत आयसीएफ, आरसीएफ आणि एमसीएफ करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
एमआरव्हीसीची भूमिका
मुंबई रेल्वे विकास महामंडळाचे (एमआरव्हीसी) अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक विलास एस. वाडेकर यांनी सांगितले की, नवीन कॉरिडॉर, अतिरिक्त मार्ग आणि क्षमता वाढीच्या इतर प्रकल्पांच्या पूर्ततेसोबतच एसी गाड्यांचा समावेश करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. यामुळे मुंबईच्या उपनगरीय रेल्वे सेवेत मोठी सुधारणा घडून येणार असल्याचे त्यांनी नमूद केले.
प्रवाशांना काय फायदा होणार
समांतर उत्पादन धोरणामुळे गाड्यांची उपलब्धता मुंबईच्या उपनगरीय रेल्वे पायाभूत सुविधांच्या विस्ताराशी सुसंगत राहील, याची खात्री करण्याचा प्रयत्न आहे. नियोजित वेळापत्रक कायम राहिल्यास, मुंबईकरांना केवळ अधिक एसी गाड्याच नव्हे, तर सुधारित आसनव्यवस्था, अधिक क्षमतेची वातानुकूलन यंत्रणा, चार्जिंग पॉईंट्स, प्रवासी माहिती प्रणाली आणि अधिक वेगाने धावणाऱ्या गाड्यांचा लाभ मिळणार आहे.