Mumbai Amravati Express Accident: ट्रक आला रुळांवर, मुंबई-अमरावती एक्सप्रेसला अपघात; जळगाव येथील घटना

ट्रक आणि ट्रेन यांच्यात झालेल्या अपघातामुळे वाहतुकीचा खोळंबा झाला आहे. ही घटना जळगाव येथील बोदवड रेल्वे क्रॉसिंग दरम्यान घडली. मुंबई-अमरावती एक्सप्रेस आणि धान्याने भरलेला ट्रक यांच्यात हा अपघात झाला.

Mumbai Amravati Express Accident: ट्रक आला रुळांवर, मुंबई-अमरावती एक्सप्रेसला अपघात; जळगाव येथील घटना
Mumbai Amravati Express Accident Jalgaon | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

मुंबई-अमरावती एक्सप्रेस (Mumbai Amravati Express) धावत असताना रुळावर अचानक आलेल्या ट्रकला धडकल्याने मोठा अपघात झाला आहे. जळगाव (Jalgaon) जिल्ह्यातील बोदवड रेल्वे क्रॉसिंग दरम्यान ही घटना घडली. सर्वत्र धुळवड साजरी होत असताना आणि रंगांची उधळन सुरु असताना झालेल्या या अपघातामुळे परिसरात सणाच्या उत्सवावर शोककळा पसरली आहे. अपघातात (Train Truck Accident) कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त अद्याप नसले तरी, मोठे नुकसान झाले असण्याची शक्यता आहे. अपघातामुळे दोन्ही बाजूची खोळंबली आहे. रेल्वे प्रशासन आणि स्थानिक प्रशासनाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. मदत आणि बचाव कार्य सुरु आहे. रेल्वे रुळांवर ट्रकमधील साहित्यांचा ढिग पसरला आहे.

बोदवड रेल्वे क्रॉसिंगवर अपघात

मुंबई-अमरावती एक्सप्रेस आपल्या नियमीत वेळेनुसार धावत होती. दरम्यान, जळगाव जिल्ह्यातील बोदवड रेल्वे क्रॉसिंगवरुन एक ट्रक रस्ता ओलांडत होता. धक्कादाय म्हणजे धान्याने खचाखच भरलेला ट्रक रुळावर आला आणि त्याच वेळी एक्सप्रेस मोठ्या वेगाने आली. सांगितले जात आहे की, ट्रक चालकाने अतिशय चुकीच्या वेळी रेल्वे फाटक ओलांडण्याचा प्रयत्न केला. ज्यामुळे हा ट्रक-रेल्वे अपघात घडला. अपघातामध्ये ट्रकचा चक्काचुर झाला आहे. रेल्वेचा वेग कमी असल्याने मोठी दुर्घटना टळली असली तरी, ट्रकचे मात्र मोठेच नुकसान झाले आहे. (हेही वाचा, Train Accident in Arunachal Pradesh: रुळ ओलांडताना कारला रेल्वेची धडक, एकाचा जागीच मृत्यू)

घटनास्थळावरुन ट्रकचालक पसार

ट्रेन-ट्रक अपघातातील जखमींवर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत. अपघात घडताच ट्रकचालकाने घटनास्थळावरुन पळ काढला आहे. वेळ पहाटेची असल्याने अपघाताचा वाहतूकीवर परिणाम झाला आहे. मुंबई हावडा मार्गावरील अप आणि डाऊन दोन्ही मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली. ज्यामुळे धुळवडीनिमित्त आणि इतरही विविध कारणांनी प्रवास करणाऱ्या नागरिकांना वाहतूकीत मोठा अडथळा निर्माण झाला. रेल्वे प्रशासन आणि स्थानिक प्रशासनाकडून वाहतूक पूर्ववत करण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत.

पहाटेच्या वेळी मोठा आवाज

अपघातग्रस्त ट्रक धान्याने खचाखच भरलेला असल्याने घटनास्थळावर धान्याचा मोठा ढिग आणी पोती पडली आहेत. शिवाय चक्काचूर झालेल्या ट्रकचे अवशेषही पडले आहेत. ज्यामुळे रस्ते आणि रेल्वेवाहतूकीस अडथळा निर्माण झाला आहे. अपघाताची माहिती मिळताच रेल्वे अधिकारी आणि मोठ्या प्रमाणावर कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. ट्रकमधील संपूर्ण माल रेल्वे ट्रॅकवर पसरला आहे. स्थानिक नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली आहे. स्थानिकांच्या मदतीने पोलीस वाहतूक पूर्ववत करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. स्थानिक नागरिकांनी सांगितले की, पहाटेच्या वेळी मोठा आवाज झाला. सूर्योदयानंतर घटनास्थळी येऊन पाहिले असता, अपघात झाल्याचे पहायाला मिळाले.

(The above story first appeared on LatestLY on Mar 14, 2025 10:06 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).