Markadwadi Markadwadi Ballot Paper Voting Suspended: मारकडवाडी येथील बॅलेट पेपर मतदान प्रक्रिया स्थगित, प्रशासनाच्या दबावामुळे गावकऱ्यांचा निर्णय

मारकडवाडी बॅलेट पेपर मतदान प्रक्रिया अखेर स्थगित करण्यात आली आहे. प्रशासनाने घेतलेली ताठर भूमिका आणि पोलिसांनी कायद्याचा धाक दाखवत गावाला आणलेले पोलीस छावणीचे स्वरुप, या पार्श्वभूमीवर ग्रामस्थांनी हा निर्णय घेतला.

Markadwadi  Markadwadi Ballot Paper Voting Suspended: मारकडवाडी येथील बॅलेट पेपर मतदान प्रक्रिया स्थगित, प्रशासनाच्या दबावामुळे गावकऱ्यांचा निर्णय
Ballot Paper Voting | (Photo credit: archived, edited, representative image)

मारकडवाडी (Markadwadi) येथील ग्रामस्थांनी आयोजित केलेली बॅलेट पेपर मतदान (Markadwadi Ballot Paper Voting) निवडणूक प्रक्रिया गावकऱ्यांनी प्रशासनाच्या दबावामुळे स्थगित केली आहे. बॅलेट पेपर मतदान पार पडण्यासाठी आवश्यक सर्व प्रक्रिया गावकऱ्यांन पूर्ण केली होती. मतपत्रिकाही छापून तयार होत्या. मतदारही मतदान केंद्रावर आले होते. मात्र, प्रशासनाने ही सर्व प्रक्रिया अवैध असल्याचे सांगत कारवाईचा इशारा दिला. गावात नव्या कायद्यानुसार जमावबंदी आदेशही लागू केले. परिणामी हे मतदान स्थगित करुन वेगळ्या पद्धतीने लढा देण्याचा निर्णय गावकऱ्यांनी घेतला आहे. आमदार उत्तम जानकर यांनी गावकऱ्यांचा निर्णय प्रसारमाध्यमांना सांगितला.

बॅलेट पेपरवर मतदान घेण्याचे कारण काय?

मारकडवाडी हे गाव सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस विधानसभा मतदारसंघात येते. महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 मध्ये संपूर्ण राज्यभर पार पडलेल्या निवडणूक प्रक्रियेप्रमाणे या गावातही इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन (Electronic Voting Machine) म्हणजेच ईव्हीएम (EVM) द्वारे मतदान झाले. मात्र, याच प्रक्रियेवर गावकऱ्यांना संशय होता. आपल्या गावातून भाजप उमेदवार  राम सातपुते यांना इतकी मते जाणे शक्यच नाही. इथे विजयी उमेदवार उत्तम जानकर यांनाच अधिक आघाडी मिळायला हवी, असे गावकऱ्यांचे मत होते. विशेष म्हणजे सातपुते यांचा पराभव झाला आहे. तर जानकर विजयी झाले आहेत. असे असले तरीसुद्धा गावकऱ्यांना झालेल्या मतदनाबाबत शंका होती. त्यामुळे गावकऱ्यांनी बॅलेट पेपरवर मतदान घेण्याचा निर्णय घेतला. (हेही वाचा, Markadwadi Ballot Paper Voting: मारकडवाडी येथे बॅलेट पेपरवर मतदान, गावकऱ्यांना EVM वर संशय; गावाला छावणीचे स्वरुप)

प्रशासनाकडून विरोध का?

गावकऱ्यांनी तहसीलदार आणि निवडणूक आयगाकडेही बॅलेट पेपरवर मतदान करण्यासाठी परवानगी मागितली होती असे समजते. मात्र, अशा प्रकारे स्वतंत्र मतदान घेणे हे कायद्यास धरुन नाही. तसे करणे अवैध असल्याचे सांगत प्रशासनाने मारकडवाडी ग्रामस्थांच्या बॅलेट पेपर मतदानास आक्षेप घेतला. इतकेच नव्हे तर मोठा फौजफाटा ग्रामिण भागातील या गावात दाखल झाला. त्यामुळे आख्या गावालाच छावनीचे स्वरुप प्राप्त झाले. इतकेच नव्हे तर पोलिसांनी या गावात भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांखाली जमावबंदी आदेश लागू केले. जर कोणत्याही नागरिकाने मतदान केले तर आम्ही इथे उभारलेली सर्व यंत्रणा पोलींग बूथ, मतपेटी आणि मतपत्रिका तर जप्त केलीच जाईल. परंतू, त्यासोबत गावकऱ्यांवर गुन्हेही दाखल करु अशी भूमिका घेतली. या गावात येत्या 5 डिसेंबरपर्यंत जमावबंदी कायम असणार आहे.

गावकऱ्यांची भूमिका काय?

पोलीस प्रशासनाने गुन्हे दाखल करण्याचा इशारा दिल्यानंतर आणि प्रचंड दबाव निर्माण केल्यानंतर मारकडवाडी ग्रामस्थ एक पाऊल मागे हटले. त्यांनी जर मतदानच होऊ दिले जात नसेल तर संघर्ष करुन तरी फायदा काय? असा विचार करुन मतदान न करण्याचा निर्णय घेतला. तसेच, यापुढेही आपला लढा कायम राहिल. मात्र, तो वेगळ्या पद्धतीने लढला जाईल. न्यायालयीन आणि सनदशीर मार्ग त्यासाठी निवडले जातील, असेही गावकऱ्यांच्या वतीने स्थानिक आमदार उत्तम जानकर यांनी सांगितले.

(The above story first appeared on LatestLY on Dec 03, 2024 11:03 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).