Maharashtra Board 12th Result 2021: दहावीचे निकाल लागले आता बारावीचे निकाल कधीपर्यंत, काय आहे Evaluation Criteria? घ्या जाणून!
बोर्डा कडून शाळा, कॉलेजला विद्यार्थ्यांचे अंतर्गत मूल्यमापनाचे मार्क्स अपलोड करण्यासाठी 23 जुलै पर्यंतचा वेळ दिला आहे. त्यामुळे 24 जुलै नंतर कधीही बोर्डाकडून अंतिम निकाल ऑनलाईन जाहीर केला जाऊ शकतो.
Maharashtra Board HSC Result 2021: महाराष्ट्रात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा बोर्डाच्या परीक्षा रद्द झाल्यानंतर आता राज्य शिक्षण मंडळाकडून 10वी, 12 वीचे निकाल अंतर्गत मूल्यमापन पद्धतीने लावण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये 16 जुलै दिवशी बोर्डाने 10वीचा निकाल जाहीर केल्यानंतर आता विद्यार्थ्यांना 12वीच्या निकालाचे वेध लागले आहेत. अद्याप महाराष्ट्र बोर्डाने 12 वी निकालाची तारीख अद्याप जाहीर केलेली नाही पण 10 वी प्रमाणेच 12वीचे निकाल देखील यंदा 31 जुलै पर्यंत लावण्याचा शिक्षण मंडळाचा प्रयत्न आहे. शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad) यांनी त्याबद्दलचे संकेत पूर्वी दिले होते त्यामुळे येत्या काही दिवसांत कधीही 12वी निकालांची देखील घोषणा होऊ शकते.
यंदा बोर्डाचे निकाल अंतर्गत मूल्यमापन पद्धतीने लावले जात असल्याने उत्तीर्ण होणार्यांचे प्रमाण अधिक आहे. 10 वी निकालामध्ये याच गोष्टीमुळे ऑनलाईन निकाल जाहीर होताच मोठ्या प्रमाणात विद्यार्थी लॉग ईन झाले आणि बराच वेळ निकालाची वेबसाईट डाऊन असल्याचंही पहायला मिळालं होते. त्यामुळे त्यासाठीची तयारी करण्यासाठी शिक्षण मंडळाकडून आता थोडा वेळ घेतला जाऊ शकतो.
12वी निकाल 2021 साठी Evaluation Criteria
दहावी प्रमाणे बारावीचा निकाल देखील यंदा अंतर्गत मूल्यमापन पद्धतीने लावला जाणार आहे. यामध्ये 40:30:30 असा फॉर्म्युला सेट करण्यात आला आहे. बारावीच्या निकालासाठी यंदा 10वी,11वी आणि 12वी चे गुण 30:30:40 या फॉर्म्युलाने ग्राह्य धरले जाणार आहेत.
कधी पर्यंत लागू शकतो 12 वीचा निकाल?
बोर्डा कडून शाळा, कॉलेजला विद्यार्थ्यांचे अंतर्गत मूल्यमापनाचे मार्क्स अपलोड करण्यासाठी 23 जुलै पर्यंतचा वेळ दिला आहे. त्यामुळे 24 जुलै नंतर कधीही बोर्डाकडून अंतिम निकाल ऑनलाईन जाहीर केला जाऊ शकतो. Maharashtra Board HSC Result 2021: महाराष्ट्र बोर्ड 12वीचा निकाल 23 जुलै नंतर; अंतर्गत मुल्यमापन प्रक्रियेचे वेळापत्रक जारी.
बोर्डाने यंदा दहावीच्या निकालासाठी result.mh-ssc.ac.in, किंवा mahahsscboard.in यावर मार्क्स पाहण्याचे आवाहन केले होते. त्यामुळे बारावीचा निकाल देखील या प्रमुख साईट्सवर प्रसिद्ध होण्याची दाट शक्यता आहे. 10 निकालादिवशी झालेला गोंधळ पाहून शालेय शिक्षणमंत्र्यांनी संबंधितांवर कारवाईचे आदेश दिल्याने किमान 12वी निकालात साईट क्रॅश होणं, सर्व्हर डाऊन होणं अशा गोष्टी होणार नसल्याची अपेक्षा शिक्षक, पालक, विद्यार्थी बाळगत आहेत.