पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा प्रभाव ओसरला? दमदार सभा झालेल्या ठिकाणी भाजप उमेदवार पराभूत
Udayanraje Bhosale, PM Narendra Modi, Pankaja Munde | (Photo Credit: Archived, edited, representative images)

Maharashtra Assembly Election Results 2019: निवडणूक कोणतीही असो, आपल्या अमोघ वक्तृत्वने उपस्थिातांवर गारुड टाकत जनमत आपल्या बाजूने वळविण्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) एकदम पटाईत. नरेंद्र मोदी यांच्याकडे अशी काय जादू आहे की, ज्यामुळे ते आपले गारुड जनतेवर फेकतात हा प्रश्न अनेकांना पडला होता. मात्र, हीच जादू महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ओसरली की काय, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. या प्रश्नाला पार्श्वभूमी अशी की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सभा घेतलेल्या काही ठिकाणी भाजप उमेदवारांचा पराभव झाला आहे. यात सातारा येथील उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) आणि परळी येथील पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांचा पराभव सर्वाधिक चर्चेत आहे.

सातारा लोकसभा पोटनिवडणुकीत उदयनराजे भोसले यांचा दारुण पराभव झाला. लोकसभा निवडणूक 2019 मध्ये उदयनराजे भोसले हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या तिकिटावर निवडणून आले होते. मात्र, अवघ्या तीन महिन्यात उदयनराजे भोसले यांनी आपल्या खासदारकीचा राजीनामा दिला आणि भाजप प्रवेश केला. उदयनराजेंचा भाजप प्रवेश हा राष्ट्रवादीला धक्का होता. त्यामुळे राष्ट्रवादीने ही जागा प्रतिष्ठेची केली होती.

दरम्यान, उदयनराजे भोसले यांच्या भाजप प्रवेशाचे प्रचंड राजकीय भांडवल झाले होते. उदयनराजे भोसले यांच्या प्रचारार्थ पंतप्रधान नरेंद्र मोदी, केद्रीय गृहमंत्री आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमीत शाह यांनी सभा घेतल्या होत्या. साताऱ्याच्या सभेत पंतप्रधान मोदी यांनी शरद पवार यांच्यावर प्रचंड मोठ्या प्रमाणावर टीका केली होती. (हेही वाचा, विधानसभेची नाही, ही तर नात्यांची लढाई; जाणून घ्या कुटुंबातील लढतीमध्ये कोणी आहे आघाडीवर)

परळी विधानसभा मतदारसंघातही पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांनी सभा घेतल्या होत्या. या सभेत पंकजा मुंडे यांनी प्रचंड शक्तीप्रदर्शन केले होते. पंकजा मुंडे आणि भाजप उमेदवारांच्या प्रचारार्थ परळी येथे घेतलेल्या वेगवेगळ्या सभांमधून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांनी शरद पवार, गांधी कुटुंबीय आणि काँग्रेस, राष्ट्रवादीवर प्रचंड टीका केली होती. मोदी, शाह यांच्या सभांचा मोठा फायदा भाजप उमेदवारांना होईल अशी चर्चा होती. प्रत्यक्षात मात्र जनमताचा कौल वेगळाच आला. सातारा आणि परळी विधानसभा मतदारसंघात भाजप उमेदवारांचा धक्कादायकरित्या पराभव केला. त्यामुळे नरेंद्र मोदी आणि भाजपच्या आक्रमक प्रचाराची जादू आता ओसरली आहे काय? अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

दरम्यान, विधानसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रातील एकूण 288 जागांपैकी शिवसेना ही 124 तर भाजप हा 164 जागांवर लढत होता. उर्वरीत जागांव युतीचे मित्रपक्ष लढत होते. तर, दुसऱ्या बाजूला काँग्रेस-राष्ट्रवादी हे पक्ष आघाडी करुन लढत आहेत. काँग्रेस 147 तर, राष्ट्रवादी 124 जागा लढवत आहे. उर्वरीत जागा दोन्ही पक्षांनी समाजवादी पक्ष, आरपीआय, स्वाभिमानी शेतकरी संघटना, जनता दल, शेतकरी कामगार पक्ष अशा मित्रपक्षांना सोडल्या आहेत.