IIT Bombay Student Dies by Suicide: आयआयटी मुंबईत विद्यार्थ्याची आत्महत्या, परीक्षेत मोबाईल वापरून ChatGPT वर उत्तरे शोधल्याचा आरोप
आयआयटी मुंबईतील एनर्जी सायन्स अँड इंजिनिअरिंग विभागाच्या द्वितीय वर्षाच्या विद्यार्थ्याने आत्महत्या केली आहे. परीक्षेदरम्यान मोबाईल फोन वापरून प्रश्नपत्रिका ChatGPT वर अपलोड केल्याचे आढळल्यानंतर काही तासांतच ही घटना घडली.
भारतीय तंत्रज्ञान संस्था (IIT Bombay) मुंबई येथील एनर्जी सायन्स अँड इंजिनिअरिंग विभागाच्या (Department of Energy Science and Engineering) द्वितीय वर्षाच्या विद्यार्थ्याने आत्महत्या (Suicide) केल्याची घटना घडली आहे. गुरुवारी सायंकाळी त्याचे निधन झाल्याची माहिती आयआयटी मुंबईकडून देण्यात आली. प्राध्यापक आणि विभागप्रमुखांशी केलेल्या चर्चेनंतर विद्यार्थी आपल्या वसतिगृहाच्या खोलीत परतला होता. मात्र, सायंकाळी उशिरा तो आपल्या खोलीत मृतावस्थेत आढळला. या दुर्दैवी घटनेमुळे संपूर्ण संस्थेत शोककळा पसरली आहे.
आयआयटी मुंबईने दिलेल्या अधिकृत निवेदनानुसार, गुरुवारी दिवसा एका परीक्षेदरम्यान हा विद्यार्थी परीक्षा हॉलमध्ये मोबाईल फोन वापरताना आढळला होता. त्याने परीक्षेचे प्रश्नपत्रक ChatGPT वर अपलोड करून उत्तरे शोधण्याचा प्रयत्न केल्याचे समोर आले होते.
या प्रकरणी विद्यार्थ्यावर कोणतीही शिस्तभंगाची कारवाई सुरू करण्यात आली नव्हती. मात्र, प्राध्यापक आणि विभागप्रमुखांनी विद्यार्थ्याशी याबाबत चर्चा करत त्याचे समुपदेशन केले आणि या घटनेचा त्याच्या शैक्षणिक कारकिर्दीवर विपरीत परिणाम होणार नाही, असे आश्वासनही दिले होते.
आयआयटी मुंबईत विद्यार्थ्याची आत्महत्या
आयआयटी पवईमध्ये एका विद्यार्थ्याने आत्महत्या केल्यानंतर संस्थेतील काही विद्यार्थ्यांनी आपल्या मागण्यांसाठी आंदोलन सुरू केले आहे. याबाबत माहिती देताना डीसीपी दत्तात्रय नलावडे म्हणाले, "आज आयआयटी पवईमध्ये एका विद्यार्थ्याने आत्महत्या केली. यानंतर काही आयआयटी विद्यार्थी एकत्र येऊन आपल्या मागण्यांसाठी आंदोलन करू लागले. आयआयटी प्रशासनाकडून त्यांच्याशी चर्चा करून सामंजस्याने तोडगा काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत. पोलिसांकडूनही येथे आवश्यक ती सर्व व्यवस्था करण्यात आली आहे." आत्महत्या केलेला विद्यार्थी बी.टेकच्या द्वितीय वर्षात शिकत होता, अशी माहितीही त्यांनी दिली. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिसांकडून सुरू असल्याचेही डीसीपी नलावडे यांनी स्पष्ट केले.
आयआयटी मुंबईची प्रतिक्रिया
आयआयटी मुंबईने आपल्या निवेदनात या घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले आहे. विद्यार्थ्याच्या मित्रांना, वर्गमित्रांना, प्राध्यापकांना आणि या घटनेमुळे प्रभावित झालेल्या इतर सर्वांना संस्थेकडून आवश्यक ते सहकार्य आणि आधार दिला जात असल्याचे संस्थेने स्पष्ट केले आहे. या मृत्यूमागील नेमकी कारणे शोधण्यासाठी संबंधित यंत्रणांकडून चौकशी सुरू करण्यात आली आहे.
विद्यार्थ्यांचं आंदोलन, पारदर्शकतेची मागणी
आयआयटी मुंबईत झालेल्या आत्महत्येच्या घटनेनंतर आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांपैकी एक असलेल्या प्रणय याने आपली प्रतिक्रिया दिली. तो म्हणाला, "मी आयआयटी मुंबईतील इलेक्ट्रिकल शाखेचा तृतीय वर्षाचा विद्यार्थी आहे. आमच्या महाविद्यालयात आत्महत्या झाल्यामुळे आम्ही आज आंदोलन करत आहोत. प्रशासनाकडून जबाबदारी आणि पारदर्शकता यांची मागणी करण्यासाठी आम्ही रस्त्यावर उतरलो आहोत. ही पहिलीच घटना नाही. यंदाच्या वर्षात अशा चार घटना घडल्या असून, त्यापैकी दोन गेल्या दोन महिन्यांतच घडल्या आहेत. असे का घडत आहे किंवा त्यामागील नेमकी कारणे काय आहेत, याबाबत आम्हाला पूर्णपणे अंधारात ठेवण्यात आले आहे... डीन, संचालक आणि प्रशासनाने या प्रकरणाची चौकशी करू, जबाबदारी आणि पारदर्शकता सुनिश्चित करू आणि यापुढे त्यांच्या कार्यकाळात अशा घटना पुन्हा घडणार नाहीत, याची हमी देणारा अहवाल सादर करावा, इतकीच आमची मागणी आहे."