महाराष्ट्र: सावधान! विकेंड करिता घराबाहेर पडणा-यांनी, जाणून घ्या राज्यात कुठे कुठे आहे Weekend Lockdown?
Lockdown | File Image | (Photo Credits: PTI)

राज्यात कोरोना बाधितांची वाढती संख्या पाहता अनेक जिल्ह्यांत कोरोनाचे नियम कडक केले असून संचारबंदी (Curfew) लागू करण्यात आली आहे. महाराष्ट्रातील कोरोनाची स्थिती अजून हाताबाहेर गेली नसल्याने ती पूर्ववत आणण्यासाठी राज्य सरकार सर्वोतोपरी प्रयत्न सुरु आहेत. म्हणून काही जिल्ह्यात विकेंड लॉकडाऊन (Weekend Lockdown) घोषित करण्यात आला आहे. त्यामुळे आज आणि उद्या विकेंड समजून घराबाहेर पडणार असाल तर राज्यातील कोणत्या जिल्ह्यात लॉकडाऊन ठेवण्यात आला आहे याची माहिती करुन घ्या आणि त्यानंतरच घराबाहेर जाण्याचे प्लान आखा.

औरंगाबादमध्ये उद्या म्हणजेच रविवारी कडक लॉकडाऊन असणार आहे. यावेळी केवळ अत्यावश्यक सेवाच उपलब्ध होणार आहे. तसेच नागपूरमध्ये आज विकेंड लॉकडाऊन असणार आहे. तर 15 मार्चपासून जिल्ह्यात कडक लॉकडाऊन असणार आहे. विकेंड लॉकडाऊनमध्ये पालिकेने लोकांना घरातून बाहेर न पडण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.हेदेखील वाचा- Nagpur Lockdown: नागपूरच्या कॉटन मार्केट मध्ये सोशल डिस्टंसिंगचा फज्जा; 15 मार्चपासून कडक लॉकडाऊन

नाशिक जिल्ह्यात आज आणि उद्या जीवनावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने बंद राहतील. तसेच धार्मिक स्थळे देखील बंद ठेवण्यात येणार आहे. तर पिंपरी- चिंचवडने स्वतंत्रपणे नवी नियमावली जाहीर केली आहे. दुकानांमध्ये आणि भाजी मंडईत गर्दी न करण्याचे आदेश आहेत. परभणी जिल्ह्यात कालपासून दोन दिवस संचारबंदी लागू करण्यात आलेली आहे.

धुळे जिल्ह्यातही कर्फ्यू लावण्यात आला आहे. मीरा - भाईंदर महानगरपालिका क्षेत्रातील हॉटस्पॉट असलेल्या भागात लॉकडाऊन घोषीत करण्यात आले आहे. मीरा- भाईंदर क्षेत्रातील वाढत्या कोरोनाच्या रुग्णसंख्येमुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. 13 ते 31 मार्च मध्यरात्री 12 पर्यंत हॉटस्पॉट असलेल्या क्षेत्रात लॉकडाऊन असणार आहे. दरम्यान मीरा भाईंदर हॉटस्पॉट क्षेत्राबाहेरील सर्व हॉटेल, बार, बँक्वेट हॉल आणि फूड कोर्ट 50 टक्के क्षमतेने सकाळी 7 ते रात्री 11 पर्यंत सुरु राहणार आहे. तसेच सर्व दुकाने सकाळी 9 ते रात्री 11 पर्यंत 30 टक्के क्षमतेने सुरू राहणार आहे.