Gram Panchayat Election 2021: ग्रामपंचायत निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज ऑफलाईन भरण्यास निवडणूक आयोगाची परवानगी; नामांकन दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस
Gram Panchayat Election 2021 (PC - PTI)

Gram Panchayat Election 2021: ग्रामपंचायत निवडणूक (Gram Panchayat Election) लढवणाऱ्या उमेदवारांसाठी अत्यंत दिलासादायक बातमी आहे. निवडणूक आयोगाकडून (Election Commission) ग्रामपंचायत निवडणुकीसाठी ऑफलाईन अर्ज (Offline Application) भरण्यास परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे ग्रामपंचायत निवडणुकीत आपलं नशीब आजमावणाऱ्या उमेदवारांना आज संध्याकाळी 5 वाजून 30 मिनिटांपर्यंत ऑफलाईन अर्ज भरता येणार आहे.

सध्या ग्रामीण भागात ग्रामपंचायत निवडणुकीचं बिगुल वाजलं आहे. राज्यात 14 हजार 434 ग्रामपंचायतीचा निवडणुकांचं नामनिर्देशन पत्र भरण्यासाठी ऑनलाइन काम सुरू आहे. मात्र, अनेक ठिकाणी उमेदवारांना ऑनलाईन अर्ज भरण्यास अडथळा येत आहे. आतापर्यंत राज्यात केवळ 3 लाख 32844 नामनिर्देशन पत्र प्राप्त झाले आहेत. आज ऑनलाईन यंत्रणेवर आणखी जास्त लोड येण्याची शक्यता आहे. म्हणून निवडणुक आयोगाने आज संध्याकाळपर्यंत ऑफलाईन अर्ज भरण्याची परवानगी दिली आहे. त्यामुळे उमेदरवारांना मोठा दिलासा मिळाला आहे. (वाचा - Maharashtra Gram Panchayat Election 2021: तब्बल 2 कोटी रुपयांच्या बदल्यात उमराणे ग्रामपंचायत बिनविरोध; बोली लावून थांबवली निवडणूक)

दरम्यान, ऑनलाईन यंत्रणा हँग झाल्याने उमेदवारांना मनस्ताप सहन करावा लागला होता. त्यामुळे निवडणुक आयोगाने उमेदवारांना ऑफलाईन नामांकन दाखल करण्यास परवानगी दिली. उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आज शेवट दिवस असणार आहे. त्यामुळे उमेदवार आज संध्याकाळी साडेपाचपर्यंत आपला उमेदवारी अर्ज ऑफलाईन पद्धतीने भरू शकतात.

मुंबई ग्रामपंचायत अधिनियम कायदा 1958 मधील कलम 5 मध्ये प्रत्येक गावासाठी एक ग्रामपंचायत स्थापन करण्याची तरतूद करण्यात आली आहे. परंतु, एखाद्या गावामध्ये 600 लोकसंख्या असेल त्याठिकाणी गट ग्रामपंचायत स्थापन करण्याची तरतूद करण्यात आलेली आहे.