शेतकरी कर्जमाफीची दुसरी यादी ठाकरे सरकारकडून जाहीर, 2 लाखांपेक्षा अधिक लाभार्थी

आज (29 फेब्रुवारी) ठाकरे सरकारने शेतकरी कर्मजाफीच्या दुसऱ्या यादीची घोषणा केली असून यामध्ये 2 लाखापेक्षा अधिक लाभार्थी आहेत. याबाबत माहिती जिल्हा उपनिबंधख दिग्विजय आहेर यांनी कर्जमाफीच्या पोर्टलवर दिली आहे.

शेतकरी कर्जमाफी यादी जाहीर (Photo Credits-File Image)

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्या सरकारने 24 फेब्रुवारीला शेतकरी कर्जमाफीची पहिली यादी जाहीर केली होती. त्यानुसार सुमारे 15 हजार 358 शेतकऱ्यांना याचा लाभ मिळाला. कर्जमाफीच्या या पहिल्या यादीत प्रत्येक जिल्ह्यामधील दोन गावांचा समावेश होता. पहिल्या यादीत 2 लाखापेक्षा कमी कर्ज असणाऱ्या शेतकऱ्यांना याचा फायदा झाला होता. तर आज (29 फेब्रुवारी) ठाकरे सरकारने शेतकरी कर्मजाफीच्या दुसऱ्या यादीची घोषणा केली असून यामध्ये 2 लाखापेक्षा अधिक लाभार्थी आहेत. याबाबत माहिती जिल्हा उपनिबंधख दिग्विजय आहेर यांनी कर्जमाफीच्या पोर्टलवर दिली आहे.

सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांनी शुक्रवारी विधानपरिषदेत शनिवारी शेतकरी कर्जमाफीची दुसरी यादी जाहीर होणार असल्याचे म्हटले होते. दुसऱ्या यादीत 2 लाखांपेक्षा अधिक कर्ज असणाऱ्या शेतकऱ्यांना याचा फायदा होणार आहे. त्यानुसार महात्मा ज्योतिबा फुले शेतकरी कर्जमाफी योजनेअंतर्गत 2 लाख 52 हजार शेतकऱ्यांची यादी जाहीर करण्यात आली आहे. दुसऱ्या यादीत वर्धा जिल्ह्यातील माहिती समोर आली आहे. वर्धामधील 46 हजार 424 शेतकऱ्यांचा समावेश आहे. तर जिल्हा प्रशासनाकडून आधार प्रमाणिकरणाच्या प्रक्रियेला सुरुवात करण्यात आली आहे. पहिल्या यादीत सुद्धा वर्ध्यातील 166 जणांचा समावेश होता. यामधील 154 जणांच्या खात्यात पैसे जमा झाले आहेत.(मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सरकारची शेतकरी कर्जमाफीची पहिली यादी जाहीर, पाहा कोणाला मिळाला लाभ?)

राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमुक्त करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. शेतकरी कर्जमाफीची पहिली यादी 24 फेब्रुवारी या दिवशी जाहीर होईल, असे उद्धव ठाकरे यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पूर्वसंध्येलाच जाहीर केले होते. त्यानुसार अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी (24 फेब्रुवारी 2020) सरकारने शेतकरी कर्जमाफीची पहिली यादी जाहीर केली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषदेच्या माध्यातून शेतकरी कर्जमाफी माहिती दिली होती. या वेळी बोलताना उद्धव ठाकरे यांनी सांगितले होते की, महाविकासआघाडी सरकार हे जनतेला बांधील आहे. विरोधकांना नाही. सुरुवातीला सरकारबद्धल अनेकांना शंका होत्या. पण, आता सरकार स्थिर झालं आहे. त्यामुळे विरोधकांना पोटदुखी सुरु झाली आहे. महाविकाआघाडी सरकारने शेतकरी कर्जमाफीचं अश्वासन दिले होते.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement