भाजपला धक्का; औरंगाबाद महापालिका निवडणुकीच्या तोंडावर किशनचंद तनवाणी 8 ते 10 नगरसेवकांसह करणार शिवसेना प्रवेश
Kishanchand Tanwani |(Photo Credits: Facebook)

राज्यात महाविकासआघाडी सरकार आल्यानंतर स्थानिक राजकारणाचे संदर्भही बदलू लागले आहेत. अगदी ग्रामपंचायत, महापालिका, नगरपरिषदा, पंचायत समिती, जिल्हा परिषद निवडणुकांमध्येही बदलाचे वारे वाहू लागले आहे. दुसऱ्या बाजूला भाजपने केलेल्या राजकारणाला प्रत्युत्तर भाजपच्याच डावपेचांनी दिले जाऊ लागले आहे. त्यामुळे स्थानिक पातळीवर मोठे पक्षांतर होत असताना दिसत आहे. याचेच प्रत्यंत औरंगाबाद येथेही येताना दिसत आहे. औरंगाबाद महापालिका निवडणूक तोंडावर आली असतानाच शिवसेना (Shiv Sena) भाजपला धक्का देण्याच्या विचारात आहे. भाजप (BJP) माजी शहराध्यक्ष किशनचंद तनवाणी शिवसेना पक्षात प्रवेश (Kishanchand Tanwani Likely Joins shiv sena) करत असल्याचे वृत्त आहे. दरम्यान, किशनचंद तनवाणी (Kishanchand Tanwani) यांच्यासह भाजपचे 7 ते 8 नगरसेवकही शिवसेना प्रवेश (Aurangabad BJP Leader in Shivsena) करणार असल्याचे समजते.

प्राप्त माहितीनुासार, किशनचंद तनवाणी हे मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या भेटीसाठी मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहेत. किशनचंद तनवाणी आणि गजानन बरवाल हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची त्यांचे खासगी निवासस्थान 'मातोश्री' येथे भेट घेणार आहेत. या भेटीत तनवाणी शिवसेना पक्षात प्रवेश करतील आणि शिवबंधनात अडकतील. किशनचंद तनवाणी यांनी शिवसेना प्रवेश केल्यास तो त्यांचा विशेष पक्षप्रवेश नव्हे तर, गृहवापसी असणार आहे. कारण, तनवाणी हे मुळचे शिवसेनेचेच कार्यकर्ते होते. मात्र, पुढे काही कारणांनी त्यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र केला होता. (हेही वाचा, पालघर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी शिवसेना नेत्या भारती कामडी यांची निवड)

औरंगाबाद महापालिका पक्षीय बलाबल

 

पक्षाचे नाव महापालिकेती जागा
शिवसेना 29
भाजप 22
एमआयएम 25
काँग्रेस 10
राष्ट्रवादी 03
बसप 05
रिपब्लिकन पक्ष 01
अपक्ष 18

दरम्यान, औरंगाबाद महापालिका निवडणूक डोळ्यासमोर ठेऊन राजकीय पक्षांनी राजकारण तापविण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे औरंगाबाद शहराचे नाव 'संभाजीनगर' करण्याची मागणी पुन्हा एकदा ऐरणीवर आली आहे. सत्तेत असलेली शिवसेना ही मागणी गेली अनेक वर्षे करत आहे. दरम्यान, राज ठाकरे यांच्या नेतृत्वातील महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षाने औरंगाबादचे नामकरण संभाजीनगर करावा असा मुद्दा हाती घेतला आहे. त्यामुळे येत्या काळात औरंगाबाद शहराचे राजकारण बरेच वेगळे वळण घेण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमवीर किशनचंद तनवाणी यांचा संभाव्य शिवसेना प्रवेश महत्त्वाचा मानाला जाता आहे.