Attack On Saif Ali Khan: अभिनेता सैफ अली खानवर हल्ला, जितेंद्र आव्हाड यांचा गंभीर आरोप
राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी राज्यातील कायदा-सुरक्षा व्यवस्थेवर जोरदार टीका केली आहे. जिथे लोकप्रतिनिधी सुरक्षित नाहीत, जिथे हाय प्रोफाइल व्यक्ती सुरक्षित नाहीत, तिथे सर्वसामान्यांचं काय घेऊन बसलात, महाराष्ट्राला लागलेली गुन्हेगारीची कीड याला जबाबदार कोण?
Attack On Saif Ali Khan: बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान आणि अभिनेत्री करीना कपूर यांच्या वांद्रे पश्चिम येथील घरात गुरुवारी पहाटे मोठी चोरीची घटना घडली. चोरीदरम्यान सैफ अली खानवरही चाकूने हल्ला करण्यात आला. पोलिसांनी सांगितले की, सैफ अली खानला लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्याच्यावर उपचार सुरू आहेत. सैफ अली खानवर झालेल्या हल्ल्याबाबत मुंबई पोलिसांनी सांगितले की, एका अज्ञात व्यक्तीने अभिनेत्याच्या घरात प्रवेश केला. यानंतर सैफ आणि घुसखोर यांच्यात बाचाबाची झाली. यावेळी त्याने सैफ अली खानवर चाकूने हल्ला केला. या प्रकरणाचा पुढील तपास सुरु आहे. पोलिसांनी आता सीसीटीव्ही स्कॅन करून हल्लेखोराचा शोध सुरू केला आहे. (हेही वाचा - Attack On Saif Ali Khan: अभिनेता सैफ अली खानवर चाकूने हल्ला; रात्री घरात घुसलेल्या चोरट्याने केले वार, लीलावती रुग्णालयात ऑपरेशन सुरू)
दरम्यान या हल्ल्यानंतर महाराष्ट्रात कायदा-सुव्यवस्थेचे कसे धिंडवडे निघालेत, हा प्रश्न मुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांनी स्वतःला विचारायला नको का? असे त्यांनी ट्वीटमध्ये म्हटले. वांद्रेसारख्या परिसरात एका लोकप्रतिनिधीची गोळ्या झाडून हत्या केली जाते, एका अभिनेत्याच्या घराबाहेर बेछूट गोळीबार होतो आणि आता अभिनेता सैफ अली खान यांच्या घरी शिरून त्यांच्यावर चाकूनं हल्ला केला जातो. अशाप्रकारची उघड-उघड दहशत पाहण्यासाठी मुंबई सरावलेली नाही, असे आव्हाड यांनी ट्वीटमध्ये म्हटले आहे.
सैफ अली खान यांच्यावर झालेला हल्ला हा पुर्वनियोजित कटाचा भाग असू शकतो.गेली अनेक वर्ष ज्या पद्धतीने सैफ अली खान यांना त्याच्या मुलाचे नाव *#तैमुर* ठेवल्यावरुन टार्गेट केले जात होते.ते पाहता धार्मिक कट्टरतावाद्यांकडून हा हल्ला करण्यात आलेला आहे किंवा कसे ? या दिशेने ही तपास होणे आवश्यक आहे. असेही त्यांनी म्हटले आहे.