पंतप्रधान मोदी आणि अमित शाह यांच्या विरोधात सांभाळून बोला; आशिष शेलार यांनी दिला जितेंद्र आव्हाड आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना इशारा

भाजपचे नेते आशिष शेलार यांनी आज एका कार्यक्रमादरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आणि राज्याचे नवे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड तसेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे.

Ashish Shelar (Photo Credits: You Tube)

दिल्लीतील जवाहरलाल नेहरु विद्यालय (जेएनयू) मध्ये काल रात्री (रविवारी) विद्यार्थ्यांनावर हिंसाचार करण्यात आला. घडलेल्या प्रकारावर देशभरातून निषेध व्यक्त करण्यात आला. इतकाच नव्हे तर राज्यातील राजकारण देखील यामुळे पेटलं असल्याचे दिसून येते. भाजपचे नेते आशिष शेलार यांनी आज एका कार्यक्रमादरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आणि राज्याचे नवे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड तसेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याविरोधात बोलताना सांभाळून बोलण्याचा इशारा आशिष शेलार यांनी आपल्या भाषणातून दिला आहे.

आशिष शेलार आपल्या भाषणात म्हणाले, "जितेंद्र आव्हाड हे एक कॅबिनेट मंत्री झाले आहेत. तेव्हा आता केवळ आमदार असल्यासारखं त्यांनी वागून चालणार नाही. त्यांनी जबाबदारीने वागायला हवं. या देशाचे पंतप्रधान, गृहमंत्री यांच्यावर बोलताना त्यांनी सांभाळून बोलावं अशी ताकीद आम्ही त्यांना देतो आहे."

इतकंच नव्हे तर आशिष शेलार यांनी, "ते आता गृहनिर्माण मंत्री नसून गृह कलह मंत्री झाले आहेत," अशा शब्दात जितेंद्र आव्हाड यांच्यावर टीका केली.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जेएनयूमध्ये हिंसाचाराची तुलना मुंबईतील 26/11 हल्ल्याशी केली. त्यावर प्रत्युत्तर देताना, शेलार म्हणाले, "मुख्यमंत्र्यांनी केलेलं हे विधान निंदनीय आहे. ज्या अधिकाऱ्यांनी आत्मबलिदान दिलं त्यांचा अपमान करण्यासारखं आहे.ज्या शूरवीरांनी हा हल्ला परतवला त्यांचा अपमान करण्यासारखं होतं."

दरम्यान, दिल्लीतील विद्यार्थ्यांवर झालेल्या हिंसाचाराविरुद्ध आज गेट वे ऑफ इंडिया येथे विद्यार्थ्यांनी आंदोलन केले. या आंदोलना दरम्यान जितेंद्र आव्हाड यांनी प्रसारमाध्यांशी बोलताना नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्यावर टीका केली होती.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement